जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा संपन्न.
सिकलसेल रूग्णाच्या सुविधेसाठी संसदेत आवाज उठवणार.
आशा वर्करला उत्कृष्ट कामासाठी पुरस्कृत करणार.
आरोग्य कर्मचारी, जिल्हास्तरीय यंत्रणेचा कोरोना कामासाठी अभिनंदन ठराव.
बचत गटांना प्रशिक्षण, स्वयंरोजगारासारी प्रोत्साहन.
कृषी केंद्रावर गुन्हे दाखल करा.
गणवेश वाटपात सर्वसमावेशकता आणावी
Bhairav Diwase. July 10, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- संजय गांधी निराधार योजने पासून तर राज्य व केंद्र शासनाच्या विविध अल्प आर्थिक साहाय्य देणाऱ्या योजना या गरीब , असाहय, एकाकी, दिव्यांग नागरिकांसाठी असतात या योजनांची अंमलबजावणी करताना संवेदनशीलता ठेवून त्यांच्यापर्यंत पोचण्याची मानसिकता आवश्यक आहे यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मेळावे घेण्यात यावे असे आवाहन खा. सुरेश उपाख्य बाळू धानोरकर यांनी आज येथे केले.
एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम व इतर केंद्र पुरस्कृत योजना जिल्ह्यात राबवितांना येणाऱ्या समस्या व अडचणी सोडविण्यासाठी सर्व अंमलबजावणी अधिकारी यांनी समन्वय ठेवून विकास कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचनाही त्यांनी आज केल्या. नियोजन भवनात पार पडलेल्या जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीच्या बैठकीत त्यांनी आज जिल्ह्याच्या महत्वपूर्ण 29 योजनांचा आढावा पाच तास चाललेल्या बैठकीत घेतला.
एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम व इतर केंद्र पुरस्कृत योजनांची अंमलबजावणी, पर्यवेक्षण व संनियंत्रण, उपलब्ध निधीची तरतुद, उपाययोजना, विचार विनिमय व त्याबाबत कार्यवाही होण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, चंद्रपूरच्यावतीने आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची आढावा बैठक पार पडली.
या बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले, महापौर राखी कंचर्लावार, आ. सुभाष धोटे, आ. प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, आयुक्त महानगरपालिका राजेश मोहिते तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख व अंमलबजावणी यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी कृषी, वीज कनेक्शन, विद्युत ट्रान्सफार्मर, रस्त्यांची कामे, शाळा, आरोग्य, रोहयोची कामे, उद्योग, शिक्षण पोषण आहार, कौशल्य योजना, पाणीपुरवठा, सर्व शिक्षा अभियान, स्वच्छ भारत मिशन आदी विषयांवर विविध मुद्दे उपस्थित करुन त्यावर केलेल्या कारवाईबाबत संबंधित विभागाकडून माहिती घेण्यात आली.
त्यासोबतच यामध्ये स्वच्छ भारत मिशन, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, ग्रामीण विद्युतीकरण योजना, राष्ट्रीय ग्रामीण पाणी पुरवठा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता योजना, राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृत्ती वेतन योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आदी विषयांवर चर्चा करून आढावा घेण्यात आला. या योजना अतिशय गरीब नागरिकांसाठी असून त्या रात्री त्यांना संवेदनशीलता ठेवून लोकांपर्यंत पोहोचण्याची सकारात्मकता बाळगा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
विविध अंमलबजावणी यंत्रणांनी दिलेले कामे वेळेत पूर्ण करावीत म्हणजेच आलेला निधी खर्च होईल. विकास कामे तांत्रिक, प्रशासकीय अडचणींमुळे थांबली असल्यास ती जास्त काळ प्रलंबित न ठेवता त्याबाबत तात्काळ पाठपुरावा करुन कामे पूर्ण करावीत, अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केली.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सहा विधानसभा क्षेत्रातील पांदन रस्त्याचे काम पूर्ण करावे, अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी त्या-त्या स्थानिक आमदारांशी समन्वय साधून त्या विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांची कामे पूर्णत्वास न्यावी, अशा सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी संबंधित विभाग प्रमुखाला दिल्यात.
कोरोना प्रादुर्भावाच्या काळात आरोग्य विभागाने ग्रामपंचायत निहाय आशा वर्करची रिक्त असलेली पदे तातडीने भरावीत. तसेच कोरोना जोखमीच्या काळात ग्रामीण स्तरावर आशा वर्कर,आशा सेविका काम करीत असतात त्यांना जिल्हा व तालुका स्तरावर पुरस्कार देण्याचे करावे, अशा सूचनाही खासदार बाळू धानोरकर यांनी केल्या. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी केलेल्या धोरणातील कामासाठी अभिनंदनाचा ठराव पास केला.
खा. धानोरकर यांनी संस्थेच्या सभागृहात मांडलेल्या सिकलसेल विषयी प्रश्नावरही आज या सभागृहात देखील चर्चा झाली. जिल्ह्यातील सिकलसेल रुग्णांना बस, रेल्वे व आवश्यक त्या सुविधा मिळाव्यात, असे प्रावधान करावे असेही ते यावेळी म्हणाले.
प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी रुग्णालयात सर्वसामान्य जनतेला आवश्यक सुविधांची माहिती देणारे फलक आरोग्य विभागाकडून दर्शनी भागात लावण्यात यावे अशा सूचना देखील केल्या. जिल्ह्यातील रुग्णांना त्यांना काय सुविधा मिळू शकतात हेच माहिती नसल्यामुळे त्या सुविधांची मागणी त्यांच्याकडून होत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील गरीब जनतेला शासकीय स्तरावर असलेल्या उपाययोजनांची माहिती मिळावी. यासाठी दर्शनी भागात फलक लावण्याची सूचना त्यांनी केली.
वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी असलेली जुनी निवासस्थाने निर्लेखित करून नवीन इमारतीचे बांधकाम व त्यासाठी लागणाऱ्या निधीचे प्रस्ताव त्वरित सादर करावे. तसेच वरोरा उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे व सुरक्षारक्षकाची पदे तातडीने भरावी अशा सूचना दिल्या. तसेच प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 2016 ते 2020 या कालावधीतील घरकुलाचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करून अपूर्ण असलेली कामे पूर्णत्वास न्यावी. तसेच समाजातील विधवा, अपंग लाभार्थ्यांना घरकुल योजनेतील 5 टक्के निधी आपत्तीसाठी राखीव ठेवावा. तसेच ज्यांना घरकुल मिळाले ,अशा लाभार्थ्यांना पाच टक्के निधी आपत्तीच्या काळात लाभार्थ्याला मिळावा. यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिल्या.
राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रमाअंतर्गत निराधार योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शंभर टक्के निराधार लोकांना लाभ व्हावा. यासाठी तालुका व ग्राम स्तरावर कॅम्प आयोजित करावे व कागदपत्रांची पूर्तता करून निराधारांना लाभ देण्याचे प्रयत्न करावे. तसेच दर महिन्याच्या एक ते पाच तारखेपर्यंत सदर निराधार लाभार्थ्यांची यादी बँकेला सादर करून महिन्याच्या दहा तारखेपर्यंत सर्वांना पैसे मिळेल असे नियोजन करण्याच्या सूचना बँक अधिकाऱ्यांना दिल्या.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागामध्ये घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी नियोजन तसेच रोगराई नियंत्रण व स्वच्छता ठेवल्यास यातून गावाचा विकास होईलच तर ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान सुद्धा उंचावेल असा सल्ला सुद्धा त्यांनी दिला.
सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून महानगरपालिका, जिल्हा परिषद व नगरपालिका शाळेतील मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके व गणवेश दिले जातात. किमान 1 गणवेश ओपन व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना द्यावा असे खासदार बाळू धानोरकर यांनी शिक्षण विभागाला सूचना दिल्या.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा संदर्भात कृषी केंद्राद्वारे मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आली असून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी केंद्रावर गुन्हा दाखल करून त्याचे लायसन्स रद्द करावे अशा सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी दिल्या.