चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस शहरालगतच्या माथारदेवी परिसरात वर्धा नदीत बुडून पाच मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सम्यक देवराव सोनटक्के, संनी अशोक आस्मपेल्ली, रोहित बाबाराव बोबडे, शिव भास्कर केलझरकर आणि तन्मय नवनाथ पथाडे अशी मृत युवकांची नावे आहेत.
इंदिरा नगर परिसरातील हे पाचही मित्र पोहण्यासाठी वर्धा नदीकाठी गेले होते. मात्र रात्रीपर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला. नदीकाठी कपडे आणि मोबाईल आढळून आल्याने अनर्थाची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस, आपत्ती व्यवस्थापन आणि बचाव पथकाने रात्रभर व आज दिवसभर शोधमोहीम राबवली.
या शोधमोहीमेदरम्यान आतापर्यंत 3 युवकांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले. विशेष म्हणजे नदीत उतरण्यापूर्वी पाचही मित्रांनी एकत्र सेल्फी काढल्याची माहिती समोर आली असून तीच त्यांची अखेरची आठवण ठरली. या दुर्दैवी घटनेमुळे घुग्गुससह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृत युवकांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


