गोंडपिपरी:- धाबा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुर्लक्षितपणामुळे धामनपेट गावात अतिसाराची लागण झाली असून आतापर्यंत ८ दिवसात ५ नागरिक दगावले आहेत. उपचाराकरीता २० रुग्ण ग्रामीण रुग्णालय गोंडपिपरी येथे दाखल करण्यात आले असन प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना चंद्रपूर ला हलविण्यात आले आहे. विमल नेवारे ५०, अनुसया सरवर ४८, बयाबाई चिताडे ६०, गंगाराम मडावी ५० बापूजी धुडसे ६५ असे मृतकाचे नाव असून सर्व धामणपेट येथील रहिवासी आहेत.
गोंडपीपरी तालुक्यातील वटराणा गट ग्रामपंचायत मध्ये धामणपेट गाव येत असून ह्या गावची लोकसंख्या ३५० आहे. गोंडपीपरी पासून ३ किमी अंतरावर हे गाव आहे. इथं ग्रामीण रुग्णालये आहेत . या गावात अतिसाराची लागण झाली असून सुद्धा आरोग्य विभागाने कोणतीच दाखल न घेतल्याने या गावात ८ दिवसात ५ रुग्ण दगावले आहे. वीस रुग्ण उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गावकऱ्यांनी आमदार सुभाष धोटे यांना माहिती दिली असता क्षणाचाही विलंब न करता आमदारांनी जिल्हाधिकारी अजय गुलहाने यांचेशी संपर्क करून त्या गावात आरोग्य कॅम्प लावण्याचे निर्देश दिले.
घटनेची माहिती मिळताच स्वता धामणपेट गाठून तेथील नागरिकांची विचारपूस करून मृतकांच्या कुटूंबियाचे सांत्वन केले. यावेळेस जिल्हा आरोग्य अधिकारी गहलोत, उपजिल्हाधिकारी कर्डीले , जिल्हा शल्यचिकित्सक राठोड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राजकुमार गहलोत, उपमुख्यकार्यपलन अधिकारी क्लोडे.सवर्ग विकास अधिकारी मुंडकर उपस्थित होते.