अवघ्या २१ व्या वर्षी नक्षलग्रस्त भागात बनलीय सरपंच.
गडचिरोली:- ज्या वयात मुली साधारणत: महाविद्यालयाच्या फुलपंखी दुनियेत रमलेल्या असतात त्या अवघ्या एकविसाव्या वर्षात एक मुलगी गावासाठी लढतेय. गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील कोठी या नक्षलग्रस्त अतिदुर्गम ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या नऊ गावांचे भाग्य उजळण्यासाठी ती रात्रंदिवस झटत आहे. भाग्यश्री लेखामी, असे या तरुणीचे नाव असून ती अवघ्या एकविसाव्या वर्षी कोठी ग्रामपंचायतीची सरपंच बनली आहे.
भामरागड तालुका मुख्यालयापासून २३ किमी अंतरावर कोठी हे गाव आहे. या कोठी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाग्यश्री लेखामी यांची ग्रामसभेच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी निवड झाली. शिक्षणासोबतच सामाजिक कार्यात आवड असलेल्या भाग्यश्री लेखामी यांनी या ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या ९ अतिदुर्गम गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार केला आहे.
येथील अनेक गावांपर्यंत जायला रस्तेसुद्धा नाहीत. मात्र, आपल्या मोटारसायकलने खराब रस्ते, जंगलातील अनवट वाटांमधून, डोंगरदऱ्यांतून मार्ग काढत भाग्यश्री गावात पोहोचते. तेथील नागरिकांशी मनमोकळा संवाद साधते. या गावांमध्ये प्रत्येक सरकारी योजना यावी, यासाठी कायम प्रयत्नरत असते. भाग्यश्रीचे वडील शिक्षक आहेत. शिक्षकाची ही कन्या आता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून समाजकार्याचे शिवधनुष्य पेलत या सर्व ९ गावांची लाडकी लेक झाली आहे.
गावासाठी रात्रंदिवस काम.......
गावातील कुठलीही समस्या असो पहिली धाव भाग्यश्री लेखामी यांच्याकडेच असते. गावात रस्ते बांधायचे असोत, पाणीपुरवठ्याची समस्या असो, त्या सोडविण्यासाठी सरपंच भाग्यश्री लेखामी तत्पर असतात. कुणी अत्यवस्थ रुग्ण किंवा प्रसूतीच्या कळा सहन करणारी गर्भवती असो, त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा तालुक्याच्या रुग्णालयात पोहोचविण्यासाठी त्याच प्रथम धाव घेतात. भाग्यश्री या लहानपणापासून विकासापासून वंचित असलेल्या या गावांच्या वेदनांवर हळूवार फुंकर घालतात. या गावांना विकासाच्या वाटा दाखविण्यासाठी कष्ट उपसणाऱ्या सरपंच भाग्यश्री लेखामी यांचे परीश्रम फलद्रुप होऊन या गावांचे 'भाग्य' लवकरच उजळेल हे नक्की.
९ गावातील महिलांना वर्षभरासाठी दिले सॅनिटरी नॅपकिन्स......
कोठी ग्रामपंचायतीच्या सरपंच भाग्यश्री लेखामी यांनी या ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या ९ गावांमध्ये अनेक सरकारी योजना आणल्या. मासिक पाळीच्या काळात गावातील महिलांना त्रास होऊ नये यासाठी १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून या नऊही गावांतील महिलांना वर्षभर पुरतील एवढे सॅनिटरी पॅड्स त्यांनी उपलब्ध करून दिले आहेत. याशिवाय सिमेंट-काँक्रिट रस्ते, ठक्कर बाप्पा योजनेतून नळ पाणीपुरवठा योजना, अंगणवाड्यांची दुरुस्ती, अंगणवाडी डिजिटल करणे, अशी अनेक विकासकामे त्यांनी केली असून या विकासाचा वेग अधिक वाढविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.