Top News

विचारांच्या पलीकडील बाबासाहेब..... Dr. Babasaheb Ambedkar

अनुप व्ही.कोहळे

मु. राजनगट्टा ता.चामोर्शी
जिल्हा- गडचिरोली
मो. 9923815724

जगातला एकमेव व्यक्ती ज्याने रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांडवता आपल्या लेखणीच्या बळावर सामाजिक, राजनैतिक, धार्मिक, अशा अनेक प्रकारच्या क्रांती घडवून आणल्या असे युगप्रवर्तक क्रांतिकारक, महान अर्थशास्त्रज्ञ, जगात भारताची मान आदराने उंचावणारे राष्ट्रनिर्माते, प्रज्ञासूर्य, बोधिसत्व, महामानव, जगातील आदर्श राज्यघटनाकार, भारतरत्न, डॉ.भीमराव रामजी आंबेडकर.

खरं तर बाबासाहेबांचे नाव ओठी घेत असतांना विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे आवर्जून घ्यावे वाटते. कारण खऱ्या अर्थाने बाबासाहेब हे या विश्वातील 'अमूल्य रत्नच' होते. त्यांचे कार्यकर्तृत्वच इतके मोठे आहे की त्यांना शब्दात मांडणे कठीणच परंतु सद्या स्थितीचा विचार केला तर काही धर्माच्या ठेकेदार व स्वार्थी राजकीय पुढाऱ्यांमुळे बाबासाहेब हे विशीष्ट जाती किंवा धर्मात अडकलेले दिसतात आणि फक्त बाबासाहेब म्हणूनच नाही तर बाबासाहेबांप्रमाणेच शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, महात्मा फुले सारखे अनके महापुरुष विशिष्ट जाती किंवा धर्मात अडकलेले दिसतात. वास्तविक या सर्व महामानवांचे योगदान कोणत्याही विशिष्ट जाती किंवा धर्मा साठी नसून ते समाजातून ज्या घटकावर अन्याय अत्याचार झालं त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी होता. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी होता.
   
       आज 'अ' प्रवर्गातील जातीने एखादया महापुरुषांची जयंती उत्सव साजरे करणे हे त्या जाती किंवा धर्मातील लोकांसाठी निश्चितच गौरवास्पद बाब आहे परंतु ' अ' प्रवर्गातील लोकांनी त्या महामानवाला आपले मानले म्हणजे 'ब' प्रवर्गातील लोकांनी त्या महापुरुषाला व त्यांच्या विचारांना नाकाराणे  हे ' ब' प्रवर्गातील लोकांची कृती अतिशय लाजिरवाणी आहे. आणि असे घडते विशेषतः बाबासाहेबांच्या बाबतीत, गाव खेड्यातील किंवा बहुसंख्य 'ओबीसी' समाज बाबासाहेबांकडे वेगळ्या दृष्टीने पाहताना दिसतोय. अनेकांना वाटते बाबासाहेबांनी फक्त एससी बांधवांसाठीच सगळं काही केले त्यांच्या साठीच लढले म्हणून फक्त एससी बांधव त्यांना पूजतात व त्यांचा उदो उदो करतात. निश्चितच ज्या समाज व्यवस्थेने आपल्यातीलच एका घटकाला दलित म्हणून सतत हिनवले ज्यांना समाजात वावरण्याचा स्थान नव्हता अश्या घटकाला समाजात मान वर करून चालण्याची व्यवस्था संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी करून दिली. त्या मुळे त्या समाज बांधवांनी त्यांचा उदो उदो करणे काही गैर नाही.
       आज बहुसंख्य ओबीसींना वाटतो बाबासाहेबांनी आमच्या साठी काय केले? त्यांनी, राज्यघटनेत बाबासाहेबांनी अनुच्छेद 340 अंतर्गत ओबीसी साठी विशेष तरतूद व नतंर अनुच्छेद 341 नुसार अनुसूचित जातीचा विचार केला आहे हे विसरून चालणार नाही.
         
      आज अनेक ठिकाणी बाबासाहेबांना फक्त दलित नेते म्हणून दाखवून त्यांच्या विचारांना व आदर्शाना संकुचित करण्याचा प्रयत्न राजकीय संघटनांकडून  होत असल्याचे चित्र दिसत आहे. म्हणून आज आपल्याला वेगळ्या दृष्टीने बाबासाहेब समजून घेणे गरजेचे आहे. समाजातील असा कोणताही घटक नाही ज्याचा विचार बाबासाहेबांनी केला नाही. शेतकरी, कामगार, बालक, महिला अश्या प्रत्येक घटकाचा विचार बाबसाहेबांनी केला. कारण त्यांना समतामूलक समाज निर्माण करायचे होते. म्हनून त्यांनी राजकीय आणि आर्थिक समानता निर्मान करण्यासाठी प्रयत्न केले. त्याचाच परिणाम म्हणून आज मुकेश अंबानी असो की साधा सफाई कामगार सर्वांच्या मताचे मूल्य हे सारखेच आहे. तर भारताचे पतनियंत्रण करणारी संस्था म्हणजे रिजर्व बँक ऑफ इंडिया ची निर्मीती देखील बाबासाहेब लिखित ' The Problem of Ruppee' ह्याच ग्रँथातून झाल्याचे दिसून येते.
      
       बाबासाहेब  म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा योगदान हा सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्यीक अश्या सर्वच क्षेत्रात दिसून येतो. ते खऱ्या अर्थाने दूरद्रष्टे नेता होते म्हणूनच 1942 मध्ये कामगार मंत्री असताना मजुरांसाठी किमान वेतन पद्धती, स्त्रियांसाठी प्रसूती रजा सारख्या गोष्टींना मान्यता दिली. कामगारांसाठी कामाची वेळ 14 वरून 12 तास केले. इतकेच नाही तर देश स्वातंत्र्य झाल्यावर भविष्याचा वेध लक्ष्यात घेऊन देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी तीव्र औद्योगिकरनाला चालना दिली. सोबतच पाणी बचत काळाची गरज लक्ष्यात घेऊन ' सेंट्रल वॉटर कमिशन' ची स्थापना देखील केली. त्याच बरोबर फक्त बंदारे बांधण्यापेक्षा सम्पूर्ण नदी खोऱ्याचा विकास करावे म्हणून भाक्रा -नांगल प्रकल्प, दामोदर नदी खोरे विकास प्रकल्प, हिराकुंड प्रकल्प सारख्या अनेक बहुउद्देशीय प्रकल्पांची निर्मिती केली. त्याचाच फायदा आज अनेक शेतकरी, शेतमजूर आणि उद्योगिक कंपन्या घेत आहेत.
           आज तीन महिन्यापेक्षा अधिक काळ शेतकरी आंदोलनाला  झाला परंतु अजूनही सरकारकडून शेतकर्यांना दुर्लक्षित  केल्या जात आहे असे चित्र डोळ्यासमोर दिसत असताना , अशातच आठवण होते बाबासाहेबांची तत्कालीन परिस्थितीत शेतकऱ्यांचा विकास घडवून आणण्या साठी शेतीच्या राष्ट्रीय करनाचा पर्याय दिला व 1918 मध्ये ' Small Holding in India and their Remedies '  नावाचा ग्रंथ लिहून शेतकऱ्यांना सांगतात, "शेतीवरचा बोजा कमी करा, एकच मुलगा शेतीत ठेवा, बाकीच्यांना तिथून बाहेर काढा व उद्योग, व्यापार सेवा क्षेत्रात घाला, तेव्हाच शेतकरी सुखी होईल," शेतकरी सुखी तर देश सुखी.
            दलितांचे प्रश्न दलितांचे, स्त्रियांचे प्रश्न स्त्रियांचे, शेतकऱ्याचे प्रश्न शेतकऱ्याचे असेल तर कल्याण होणार नाही. त्यासाठी सर्व प्रश्न आणि समस्या माझे आहेत असे समजून आपल्याला त्या साठी लढावं लागेल म्हणून बाबासाहेब " उठा संघटीत व्हा आणि संघर्ष करा" असे म्हणतात.
            व्यक्ती मारल्या जाऊ शकते त्याचे विचार नाही, म्हणून आज बाबासाहेब सगळ्या पर्यंत पोहचवायचे असेल तर एक दिवस फोटो ला हार लावून व बाबासाहेब आठवून चालणार नाही तर त्यांचे विचार आत्मसात करावे लागतील तेव्हाच बाबासाहेबांना अपेक्षित समतामूलक समाज आपण निर्माण करू शकणार. आणि हीच खरी आदरंजली.......... आज च्या दिवशी बाबासाहेबांना आपण सर्वांकडून देता येईल असे मला वाटते. 


अनुप व्ही.कोहळे
मु. राजनगट्टा ता.चामोर्शी
जिल्हा- गडचिरोली
मो. 9923815724

                                             
वाचकांना सूचना:- संस्थापक / मुख्य संपादक:- कु. भैरव दिवसे द्वारा निर्मित "आधार न्युज नेटवर्क" Reg no. UAM-MH-08-0000096.... www.adharnewsnetwork.com या न्युज पोर्टलची निर्मिती दि. 04/04/2020 ला करण्यात आली. या वेबसाईट वर प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या प्रत्येकच मताशी संचालक /संपादक सहमत असतीलच असे नाही. बातमी मजकुरा संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो पोंभुर्णा तालुका न्यायालय अंतर्गत मर्यादित राहील.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने