गडचिरोली पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक; दोन नक्षलवादी ठार.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गडचिरोली:- गडचिरोली पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. एटापल्ली तालुक्यातील गट्टा-जांबिया पोलीस मदत केंद्रांतर्गत येत असलेल्या जंगल परिसरात ही चकमक झाली. पोलिसांनी यावेळी दोन नक्षलवाद्यांना ठार केलं आहे.

२२ एप्रिलच्या मध्यरात्री नक्षलवाद्यांनी गोळीबार केला होता. यावेळी पोलिसांनी सावध पवित्रा घेत गोळीबारास प्रत्युत्तर दिले होते. रात्रीच्या अंधारात पोलिसांना बाहेर येण्यास प्रवृत्त करून घातपात घडविण्यासाठी नक्षलवाद्यांनी हा गोळीबार केला होता. इतकंच नाही तर एक हँडग्रेनेडही फेकला होता. याच पार्श्वभुमीवर पोलीस दलाने परिसरात नक्षलविरोधी शोधमोहीम राबविली होती.

यावेळी दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने अंदाधुद गोळीबार केला. पोलिसांनी त्यास प्रत्युत्तर देत गोळीबार केला असता चकमकीत दोन नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलीस दलास यश आले.

दरम्यान, दोन दिवस आधी २६ एप्रिलला नक्षलवाद्यांनी अहेरी तालुक्यातील मेडपल्ली - तुमरगुडा रस्ता कामावरील वाहनांची जाळपोळ केली होती. यात पाण्याचे दोन टँकर, तीन ट्रॅक्टर व एक जोहान डिअर ट्रॅक्टरचा समावेश आहे. तसंच घटनास्थळी बॅनर व पत्रके आढळून आली होती यात 'समाधान' नावाने सरकारने आखलेल्या प्रतिक्रांतिकारी दमन नीती अंतर्गत चालू असलेल्या 'प्रहार दमन अभियानाच्या' विरोधात एप्रिलमध्ये महिनाभर 'प्रचार आणि जनआंदोलन उभे करा! असा उल्लेख होता. तसंच २६ एप्रिल रोजी या दमन मोहीमेच्या विरोधात भारत बंद करा असं आवाहन करण्यात आलं होतं.