Top News

दालमिया सिमेंट कंपनीतर्फे नारंडा येथे तलाव खोलीकरणाला सुरुवात.

भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या मागणीला यश.
Bhairav Diwase. May 09, 2021
कोरपना:- कोरपना तालुक्यातील नारंडा येथील भवानी मंदिराजवळील गाव तलावाचे व वनतलावाचे खोलीकरण कामाचे भूमिपूजन करून कामाला सुरवात करण्यात आलेली आहे.सदर कामाची मागणी माजी वित्त,नियोजन व वने मंत्री तथा माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून दालमिया भारत सिमेंट कंपनीचे युनिट हेड सुनीलजी भुसारी यांच्याकडे करण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने त्यांनी मागणीची दखल घेत तात्काळ तलाव खोलीकरणाच्या कामाला सुरवात केलेली आहे.या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून गावच्या सरपंच सौ. अनुताई ताजने, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दालमिया भारत फाऊंडेशनचे CSR प्रमुख प्रशांत भिमनवार, प्रमुख पाहुणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाळा पाटील पावडे, माजी सरपंच वसंता ताजने, पोलीस पाटील नरेश परसुटकर, देवगडे सर यांची उपस्थिती होती.
नारंडा येथे एकूण ३ तलाव असून या पूर्वी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत एका लघुसिंचाई तलावाचे खोलीकरण व एका वनतलावाची निर्मिती करण्यात आलेली होती परंतु भवानी माता मंदिराजवळील गाव तलावाचे खोलीकरण करण्यात आलेले नव्हते त्यामुळे सदर तलाव खोलीकरण करण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी दालमिया भारत सिमेंट कंपनीचे युनिट हेड सुनील भुसारी यांच्याकडे केली होती त्याअनुषंगाने त्यांनी सदर मागणीची दखल घेत तलाव खोलीकरणाचे काम मंजूर केले .
                       
              पाण्याची बचत ही काळाची गरज असून भविष्यातील पाण्याचे संकट टाळण्यासाठी जलसंधारणाचे कामे हाती घेणे अत्यावश्यक असून प्रत्येक नागरिकांनी पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही संकल्पना राबवून आपले सामाजिक दायित्व पार पाडले पाहिजे तसेच तलाव खोलीकरणाचे काम मंजूर केल्याबद्दल कंपनीचे युनिट हेड सुनील भुसारी यांचे भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी सर्व गावकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त केले.व तलाव खोलीकरणामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होणार असून शेतकऱ्यांना सिंचनाकरिता मदत होणार आहे.तसेच गावातील खासजी व शासकीय बोरवेलच्यासुद्धा पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे.असे आशिष ताजने यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत भिमनवार व पोलीस पाटील नरेश परसुटकर यांचे सुद्धा समायोचित भाषणे झाली.
            
         यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल शेंडे,रंजना शेंडे, रुपाली उरकुडे, शालिनी हेपट,अनिल मालेकर, संदीप गंगमवार, मारोती शेंडे यांची उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सत्यवान चामाटे, अजय तिखट,गौरव वांढरे,मंगल खाडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन प्रवीण हेपट व आभार प्रदर्शन अरविंद खाडे यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने