भारताच्या दूरसंचार विभागाने आयटी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वाचा मोठा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयानंतर सोशल मीडियावर फेसबुक, व्हॉट्स ॲप आणि ट्विटर या सोशल मीडिया ॲपसंबंधी अनेक मेसेज व्हायरल होऊ लागले आहेत. यात अनेक फेक मेसेज असल्याचंही पाहायला मिळत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्स ॲपसंबंधी (whatsapp) एक मेसेज व्हायरल होत आहे. आयटीच्या नव्या नियमांनुसार, आता युजर्सचे कॉल रेकॉर्ड होणार असून त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवली जाणार आहे, असं या मेसेजमध्ये म्हटलं आहे. इतकंच नाही तर तुम्ही पाठवलेल्या मेसेजवर दोन ब्लू टिक आणि एक रेड टिक आली तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असंही या मेसेज मध्ये सांगण्यात आलं आहे. परंतु, हा दावा खोटा असूनही माहिती खोटी असल्याचं समोर आलं आहे.
व्हायरल होत असलेली माहिती खोटी असून नव्या आयटी नियमांमध्ये असा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. उलटपक्षी जर एखाद्या मेसेजवर तीन लाल टिक आल्या. तर, तो मेसेज मागील वर्षीचा असून यापूर्वीदेखील व्हायरल झाला आहे हे सांगणारा तो संकेत आहे. सोबतच युजर्सचे कॉल रेकॉर्ड केले जातील किंवा त्याने धार्मिक किंवा सरकारविरोधात वक्तव्य केलं तर त्याच्यावर तात्काळ कारवाई होईल असं सांगणारा दावादेखील खोटा आहे.
_____________________________________
जाणून घ्या, आयटीची नवीन गाइडलाइन्स....
१. आयटीच्या नव्या नियमानुसार, जर सोशल मीडिया कंपनीकडे एखाद्या पोस्टची तक्रार आली. तरच, संबंधित व्यक्तीवर कारवाई करता येऊ शकते. यासाठी कंपनीला तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी लागेल. (चीफ कॉम्प्लियांस ऑफिसर, नोडल कॉन्टेक्ट पर्सन आणि रेसिडेंट ग्रेवांस ऑफिसर)
२. ज्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल त्यांचा संपर्क क्रमांक सोशल मीडिया वेबसाईटवर असावा.
३. हे तीनही अधिकारी भारतीयच असावेत.
४. जर एखादा फेक मेसेज व्हायरल होत असेल तर त्या मेसेज किंवा पोस्टविषयीची माहिती सरकार कंपनीला थेट विचारु शकते. यात ही पोस्ट सर्वात प्रथम कोणी शेअर केली याचा जाब कंपनीला विचारला जाईल.
५. कोणत्याही युजरवर थेट कारवाई करण्यापूर्वी सरकार व कंपनी यांच्यात नियम व अटींवरुन चर्चा होईल.