Top News

दोन जिल्ह्याचे ३०० वर महाविद्यालयीन कर्मचारी उतरले खेळाच्या मैदानात #chandrapur #gadchiroli

गडचिरोली:- कोणत्याही आजाराला लढण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे फार महत्त्वाचे असते. शरीराला जितका त्रास द्याल, तितके चांगले राहाल. आपले आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी अशा खेळ महोत्सवाचे आयोजन व्हायला हवे.
शेतकरी शेतात दिवस-रात्र काम करतात. त्यामुळे ते शारीरिकदृष्ट्या खूप चांगले राहतात. त्यामुळे आरोग्यासाठी तरी खेळ खेळा, असे प्रतिपादन ॲथलेटिक्स व पाॅवर लिफ्टिंग खेळातील अर्जुन पुरस्कारप्राप्त राष्ट्रीय खेळाडू विजय मुनीश्वर यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठाच्या मैदानावर अमृत क्रीडा व कला महोत्सवाचे क्रीडा ज्योत पेटवून उद्घाटन केल्यानंतर प्रमुख अतिथी म्हणून मुनीश्वर बोलत होते.
यावेळी मंचावर उद्घाटक म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील तर अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे उपस्थित हाेते. प्रमुख अतिथी प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल चिताडे, विज्ञान व तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ. सुरेश रेवतकर, वित्त व लेखा अधिकारी दशपुत्रे, माजी जिल्हा क्रीडा अधिकारी मदन टापरे, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालक डॉ. अनिता लोखंडे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. शैलेंद्र देव, नवोपक्रम, नवसंशोधन व सहचर्य विभागाचे संचालक डॉ. मनीष उत्तरवार,ज्ञानेश महाविद्यालय नवरगावचे प्राचार्य डॉ. बाकरे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
या क्रीडा व कला महोत्सवात गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ३०० वर महाविद्यालयीन कर्मचारी सहभागी झाले आहेत. उद्घाटनप्रसंगी खेळाडूंनी पथसंचलन करून अतिथींना मानवंदना दिली. तसेच महात्मा गांधी महाविद्यालय गडचांदूरच्या विद्यार्थ्यांनी रेलानृत्य तसेच लोकगीत आणि नाटिका सादर करून उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळवली.
कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे म्हणाले, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये खेळाविषयीचा सहज भाव निर्माण झाला, ही खूप चांगली बाब आहे. राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर या स्पर्धांमधून ते आपला ठसा उमटवतील. यातले काही खेळाडू राष्ट्रीय पातळीवर देखील चमकतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे संचालन शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. महेश जोशी यांनी तर आभार डॉ. शैलेंद्र देव यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
तुम्ही खेळात हरलात तरी कर्तृत्वातून मने जिंका

पंचांचे निर्णय खेळात मान्य करायला हवे. विजय-पराजय असतोच, तो मान्य करून समाधान मानायला हवे. नोकरी करत असताना एखाद्या स्पर्धेत उतरणे ही फार मोठी बाब असते. विद्यापीठात अमृत क्रीडा आणि कला महोत्सवाचे हे पहिलेच वर्ष असताना कर्मचाऱ्यांचा उत्साह दांडगा आहे. त्यांनी विद्यापीठाचा नावलौकिक वाढवावा, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी धनाजी पाटील म्हणाले.
एखाद्या गोष्टीवर लक्ष कसे केंद्रित करावे. त्याचे प्लॅनिंग करून ते प्रत्यक्षात कसे उतरवावे, हे खेळातून शिकायला मिळते. नेहमी प्रतिस्पर्ध्याचा आदर करायला हवा. कारण प्रत्येकाला जिंकायचे असते. जरी तुम्ही हारलात तरी तुम्ही आपल्या कर्तृत्वातून इतरांची मने जिंकायला हवी, असे पाटील यावेळी म्हणाले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने