10वी आणि 12वी परीक्षादरम्यान संपूर्ण राज्यात कॉपीमुक्त अभियान राबवले जाणार #chandrapur #Mumbai #Maharashtra

Bhairav Diwase
0


मुंबई:- राज्यात 10वी आणि 12वीच्या परीक्षा केंद्रावर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी पूर्ण "कॉपीमुक्त अभियान" राबवण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी यांनी यासंदर्भात सादरीकरण केले.

या अभियानात राज्याचे "नोडल अधिकारी" म्हणून शिक्षण आयुक्त यांना आणि प्रत्येक जिल्हाधिकारी यांना, तसेच "समन्वयक अधिकारी" म्हणून माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना नियुक्त करण्यात आले आहे.

तसेच "कॉपीमुक्त अभियान"राबविण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व जिल्हा प्रशासनाने एकत्रित काम करावे यासंदर्भात जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन जनजागृती करावी. परीक्षेला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु होण्याच्या प्रत्यक्ष वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर हजर राहण्याबाबत विद्यार्थ्यांना सूचना देण्यात याव्यात आणि संवेदनशील समजल्या जाणाऱ्या परीक्षा केंद्रांवर शक्यतेनुसार चित्रीकरण करण्यात यावे असे निर्णय घेतले जात आहे.

या मोहिमेअंतर्गत शिक्षक, मुख्याध्यापक, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख यांच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद यांची जिल्हा दक्षता समिती नियुक्त केली जाईल. माध्यमांव्दारे शाळा आणि पालकांशी संवाद साधणे या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे.

याशिवाय पोलीस बंदोबस्तावरही भर देण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांच्या 50 मीटरच्या आत अनधिकृत व्यक्तीना प्रवेश नसेल. अतिसंवेदनशील, संवेदनशील, सर्वसाधारण असे परीक्षा केंद्रांचे वर्गीकरण करण्यात येईल. कलम 144 अंतर्गत प्रतिबंधकात्मक आदेश देण्यात येतील. 100 मीटरच्या आतील सर्व झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात येणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)