बारशाच्या जेवणातून 28 जणांना विषबाधा #chandrapur #gadchiroli #foodpoisoning

Bhairav Diwase
गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील रोपीनगट्टा या गावात बारशाच्या जेवणातून 28 जणांना विषबाधा (Food Poisoning) झाल्याची घटना घडली आहे.

या घटनेतील बाधितांमध्ये पाच लहान मुलांचा देखील समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या सर्वच पीडितांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मात्र, यात एका मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. तर इतर सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. या घटनेत मांसाहारी जेवणातून विषबाधा झाली असून नेमकं कारण काय याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. या मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातल्या रोपीनगट्टा गावात बारशाच्या जेवणातून 28 जणांना विषबाधा झाल्याची घटना उजेडात आली आहे. या गावातील सुरगु टेकाम यांच्या नातीचा नामकरण सोहळा घरी आयोजित करण्यात आला होता. यात मांसाहारी जेवणाचा बेत आखला गेला. पहिली पंगत उठल्यावर लगेच पंधरा मिनिटांनी जेवण केलेल्या व्यक्तींना उलटी आणि मळमळ होऊ लागली. यानंतर अन्य भोजन पंगत थांबवण्यात आली आणि बाधितांना पेंढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्यानंतर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. 

काही बाधितांना छत्तीसगड राज्यातील नजीकच्या पाखंजूर येथेही हलविण्यात आले आहे. बाधितांमध्ये पाच लहान मुलांचा समावेश आहे. तर यातील एका मुलाची प्रकृती चिंताजनक असून अन्य सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती पुढे आली आहे. या घटनेत कुणीतरी मांसाहारी भोजनात मुद्दाम विष टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.