पुणे:- तब्बल 16 दिवस उशिरा यादी जाहीर करण्याचे जाहीर करुनही अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजूनही मिटलेला नाही. अल्पसंख्याक कोट्यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय आल्यामुळे अकरावीची पहिली गुणवत्ता यादी पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
26 जून रोजी जाहीर करण्यात येणारी पहिली गुणवत्ता कधी जाहीर होणार हेच सांगितले जात नाही, यामुळे पहिल्या यादीबाबत संभ्रम वाढला आहे.
शालेय शिक्षण विभागाने अल्पसंख्याक संस्थांमधील अल्पसंख्याक कोटा वगळता इतर जागा विविध संवर्गातील आरक्षणाच्या तरतुदीनुसार भरण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाविरोधात अल्पसंख्याक शिक्षणसंस्थांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने या संस्थांच्या बाजूने निकाल देत हा निर्णय रद्द करण्याचे आदेश दिले. त्या आदेशांनुसार 23 जून रोजी शासन निर्णय जाहीर करत विभागाने हा निर्णय रद्द करत सुधारित निर्णय लागू केला आहे.
याबाबत माध्यमिक व उच्च माध्यमिक संचालनालयाचे संचालक महेश पालकर यांनी सांगितले की, सुधारित शासन निर्णयानुसार प्रणालीत बदल करण्याचे काम सुरू असून 26 जूनच्या सकाळपर्यंत ते पूर्ण करण्याची तयारी केली जात आहे. गुरुवारी सकाळपर्यंत हे बदल झाले नाहीत, तर परिपत्रकाद्वारे पुढील तारीख जाहीर केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.