Market closed : मतमोजणीच्या दिवशी "या" शहरातील आठवडी बाजार राहणार बंद!

Bhairav Diwase
चंद्रपूर:-
नगरपालिका/नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक–२०२५ चा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर दिनांक ४ नोव्हेंबर २०२५ पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, गडचांदुर, भद्रावती, वरोरा, चिमूर, ब्रम्हपूरी, नागभिड, मुल, घुग्गुस या नगरपालिकांसह भिसी नगरपंचायतीसाठी दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे.


मतमोजणीच्या दिवशी आठवडी बाजार भरविल्यास मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन आदर्श आचारसंहितेचे पालन व कायदा-सुव्यवस्था राखण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.


दिनांक २१ डिसेंबर २०२५ (रविवार) रोजी मतमोजणीच्या दिवशी घुग्गुस, बल्लारपूर व वरोरा या नगरपालिकांचा आठवडी बाजार येत असल्याने सदर बाजार बंद ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी मार्केट अँड फेअर अ‍ॅक्ट, १८६२ च्या कलम ५(अ) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी घुग्गुस, बल्लारपूर व वरोरा येथील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.


सदर आदेश आज दिनांक १९ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या सही व शिक्क्यानिशी निर्गमित करण्यात आला असून नागरिक, व्यापारी व संबंधितांनी आदेशाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.