चंद्रपूर:- गडचिरोलीवरून चंद्रपूरच्या दिशेने येणाऱ्या महामंडळाच्या एका इलेक्ट्रिक बसला भीषण आग लागली. ही घटना चंद्रपूर-गडचिरोली मार्गावर घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४३ प्रवाशांना घेऊन ही बस चंद्रपूरकडे निघाली होती. मात्र, अचानक बसमधून धूर निघू लागला आणि पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. सुदैवाने, आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने बस थांबवून सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरवले. यामुळे ४३ प्रवाशांचे प्राण वाचले असून एक मोठी दुर्घटना टळली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. या आगीमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली असून, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली की बॅटरीमधील बिघाडामुळे, याचा तपास आता पोलीस आणि महामंडळाकडून केला जात आहे.


