Top News

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साधेपणानं साजरा करा:- जिल्हाधिकारी अजय गुल्हाने.

Bhairav Diwase. Aug 13, 2020

(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) नागेश्वर गणेशकर, चंद्रपुर
चंद्रपूर:- कोरोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. यामुळे यंदाचा गणेशोत्सव कसा साजरा करावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्य़ात आल्या आहेत.

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका, स्थानिक प्रशासन, पोलीस विभाग यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. पूर्व परवानगी घेतल्याशिवाय सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करता येणार नाही. आज जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी या संदर्भातील विशेष बैठक घेत कोरोना कालावधीमध्ये मर्यादित स्वरूपात हा उत्सव साजरा करण्याचे आवाहन जिल्हावासीयांना केले आहे.

मूर्तीची विक्री मोजक्या ठिकाणावरून व्हावी. दोन स्टॉल मधील अंतर अधिक असावे. विसर्जन शक्यतो घरच्या घरी करण्यात यावे. किंवा महानगरपालिकेने सर्व सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सवाचे विसर्जन स्वतः पुढाकार घेऊन करावे. प्रत्येक ठिकाणी पल्स ऑक्सीमीटर, थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था ठेवावी, आरतीच्या वेळी गर्दी करु नये, अशा अनेक सूचना यावेळी त्यांनी केल्या.

कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण याच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी.

श्रीगणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट व घरगुती गणपती 2 फूटांच्या मर्यादेत असावी. यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातु, संगमरवर इत्यादी मूर्तींचे पूजन करावे. मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे. गणशेमुर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास या मुर्तीचे विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनावेळी किंवा 2021 च्या भाद्रपद महिन्यात पुढील वर्षीच्या विसर्जनाच्या वेळी करता येणे शक्य आहे.

जेणेकरून आगमन विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वतः व कुटुंबीयांचे कोरोना साथीच्या रोगापासून संरक्षण होईल. उत्सवाकरिता वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. परंतु घरोघरी जाऊन वर्गणी मागण्यास मनाई असेल. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे नागरिक आकर्षित होऊन गर्दी होणार नाही याकडे लक्ष द्यावे. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. कोरोना पासून स्वतःचा बचाव करण्यासाठीचे संदेश गणेश मंडळांनी प्रदर्शित करावे अशी अपेक्षा देखील प्रशासनाने केली आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी सामाजिक अंतर राखून आरोग्य विषयक उपक्रम, रक्तदान यासारखे शिबिर आयोजित करण्यात प्राधान्य द्यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू व इतर आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करावी. आरती, भजन,कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही. तसेच ध्वनिप्रदूषणाचा संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करावे.

श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादी माध्यमातून उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. मंडपामध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकासाठी शारीरिक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

गणपतीचे आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यास मनाई करण्यात येत आहे. विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्यादृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील, इमारतीतील सर्व घरगुती गणेश मूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरीत्या काढण्यास सक्त मनाई आहे.

महापालिका, विविध मंडळे,गृहनिर्माण संस्था,लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग, तसेच महापालिका, पोलिस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधन कारक राहील तसेच प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत निर्गमित होणाऱ्या सूचनांचे अनुपालन करणे आवश्यक आहे.

आज झालेल्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, नगर विकास अधिकारी विजय सरनाईक आदीचा समावेश होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने