आ. सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश.
पोंभुर्णा तहसीलदार डॉ. निलेश खटके यांनी तात्काळ पत्र काढून बँकाना दिले निर्देश.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- कोरोनाचा प्रादुर्भाव अजुनही संपलेला नाही. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना या सामाजिक अर्थसहाय्याच्या योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या मासिक अनुदानासाठी बॅंकेसमोर रांगेत उभे राहतात. हे लाभार्थी वयोवृध्द, अपंग असतात. कोरोना काळात हे योग्य नाही. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन, साथरोग कायद्यातील तरतुदीनुसार बॅंकांनी पूर्वीप्रमाणे गावोगावी लाभार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांना अनुदान वितरीत करावे, असे निर्देश विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
बैठकीच्या तासाभरानंतरच तहसिलदारांना सर्व बॅंकांना पत्र पाठवून कार्यवाहीचे निर्देश दिले. आ. मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या मागणीच्या अनुषंगाने ऑनलाईन बैठक घेतली. बैठकीला पोंभुर्णाचे तहसीलदार, विविध बॅंकांचे शाखा व्यवस्थापक, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषद सदस्य राहूल संतोषवार, पंचायत समिती सभापती अल्का आत्राम, पंचायत समिती सदस्य विनोद देशमुख, नगर पंचायत मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम, ईश्वर नैताम, मोहन चलाख, अजित मंगळगिरीवार, सुनिता मॅकलवार, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
तहसिलदार पोंभुर्णा यांनी त्वरीत उदयाच सर्व बॅंकांना यासंबंधीचे पत्र पाठविण्यात येईल, असे आश्वासन मुनगंटीवार यांना दिले. नवेगांव मोरे येथील बॅंक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापकांनी पोलिस शिपाई उपलब्ध करण्याची मागणी केली असता त्वरीत पोलिस अधिक्षकांशी चर्चा करून पोलिस उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आ. मुनगंटीवार यांनी दिले. बॅंकासमोर मंडप टाकून बसण्यासाठी खुर्च्या, पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्याच्या सुचना भाजपा पदाधिकाऱ्यांनी दिल्या.
प्रधानमंत्री आवास योजना तसेच शबरी आवास योजनेच्या आढावा देखील मुनगंटीवार यांनी यावेळी घेतला. पंतप्रधान आवास योजनेच्या 168 लाभार्थ्यांच्या डीबीआर मंजूर असून त्यातील बहुतांश प्रकरणे मान्य झाली असून काही प्रकरणांमध्ये आखीव पत्रिका, कार्यालयीन प्रकरणी काही अडचणी असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगीतले.
शबरी आवास योजनेसाठी निधी प्राप्त असून तशाच अडचणी या संदर्भात असल्याचे त्यांनी सांगितले. या अडचणींच्या निवारणासाठी एक शिबीर आयोजित करावे व त्यासाठी भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी तसेच वकील यांना आमंत्रीत करण्याच्या सुचना मुनगंटीवार यांनी दिल्या.