चंद्रपूर:- चंद्रपूर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह सुरू असताना एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. गांधी चौक परिसरात डीजेच्या तालावर नाचत असताना झालेल्या धक्काबुक्कीतून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, स्थानिक गुन्हे शाखेने तत्परता दाखवत ५ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपूर शहरात सायंकाळपासूनच विविध विहारांतून भव्य रॅली काढण्यात आली होती. हजारो अनुयायी मोठ्या उत्साहात या मिरवणुकीत सहभागी झाले होते. रात्री ११:३० च्या सुमारास इंदिरा नगरमधील भीमरत्न बहुद्देशीय युवा संस्थेची रॅली गांधी चौकात पोहोचली. येथे डीजेच्या तालावर तरुण नाचत असताना दोन गटांत किरकोळ धक्काबुक्की झाली. या किरकोळ वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले आणि काही तरुण चवताळले. यावेळी ३६ वर्षीय रविकांत टेम्बुरकर यांनी मध्यस्थी करून वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या तरुणाने रविकांत यांच्यावर चाकूने सपासप वार केले.
या हल्ल्यात रविकांत टेम्बुरकर गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र दुर्दैवाने वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. याच हल्ल्यात अनिकेत गलबले नावाचा दुसरा युवकही जखमी झाला आहे.
घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) चक्र फिरवली. नागरिकांनी एक जणाला जागीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते, त्यानंतर पोलिसांनी तपासाची गती वाढवत एकूण ५ जणांना अटक केली आहे.
चंद्रपूरच्या इतिहासात बाबासाहेबांच्या जयंती उत्साहाला अशा प्रकारे हिंसक वळण लागण्याची ही पहिलीच घटना आहे. विशेष म्हणजे, शांततापूर्ण रॅलीमध्ये काही युवक चाकू घेऊन वावरत होते, ही बाब पोलीस प्रशासनासाठी आणि शहराच्या सुरक्षेसाठी एक गंभीर चिंतेचा विषय ठरली आहे.


