Top News

वाघांचे मृत्यू रोखा; अवयव तस्करीमध्ये ४२ जणांना अटक. #Arrested #forestdepartment


नागपूर:- वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा. तसेच शिकारीवर निर्बंध लावण्यासोबतच मनुष्य-वन्यजीव असा संघर्ष होवू नये, यासाठीही प्रयत्न करावेत, असे निर्देश वन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिले.
नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर वनवृत्तातील वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी रविभवन येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या हत्तीच्या कळपाबाबतही यावेळी त्यांनी माहिती घेतली.
यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) जी. साईप्रकाश, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संजय दशपुते (नागपूर), गिरीश जोशी (अमरावती), अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (नोडल) नरेश झुरमुरे, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) बी. एस. हुडा, नागपूरचे मुख्य वनसंरक्षक कल्याण कुमार, चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण, गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक किशोर मानकर यावेळी उपस्थित होते.
वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी विशेष उपाययोजना हाती घ्याव्यात. वाघांचा अधिवास असलेल्या जंगल परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती करावी, वाघांच्या हल्ल्यापासून बचावासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या त्यांना सूचना द्याव्यात, वाघ तसेच अन्य वन्यजीवांच्या शिकारीला आळा घालण्यासाठी स्थानिक नागरिकांची मदत घ्यावी, असे निर्देश त्यांनी दिले. गेल्या काही दिवसात वन्यजीव शिकार, अवयव तस्करीच्या सात प्रकरणांमध्ये ४२ जणांना अटक केल्याची माहिती त्यांनी दिली.
छत्तीसगड येथून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात आलेल्या हत्तींकडून होणाऱ्या पीक नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना तातडीने देण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या. वन विभागातील वन रक्षकाची रिक्त पदे भरण्याबाबत पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने