गडचिरोली पोलिसांच्या सी ६० कमांडोची मोठी कारवाई.
गडचिरोली:- महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगत कोटगुल-ग्यारापत्ती जंगल परिसरात 'सी-६०' पोलिसांशी झालेल्या चकमकीत शनिवारी २६ नक्षलवादी ठार झाले. सुमारे चार तास चाललेल्या या चकमकीत जहाल नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडेदेखील ठार झाला आहे. चकमकीत तीन पोलीस गंभीर जखमी झाले असून त्यांना हेलिकॉप्टरने नागपूर येथे हलवण्यात आले आहे.
कोण आहे मिलिंद तेलतुंबडे?
मिलिंद तेलतुंबडे हा कुख्यात माओवादी नेता होता. गेल्या अनेक वर्षांपासून तो भूमिगत होता. तेलतुंबडे मूळचा महाराष्ट्रातील असून यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावचा रहिवासी होता. ३२ वर्षांपूर्वी त्याने चंद्रपूरला अखिल महाराष्ट्र कामगार संघटनेतून कामाला सुरुवात केली होती. 'वेकोलि' कंपनीच्या अधिकाऱ्याच्या खुनानंतर तो बेपत्ता झाला. तो नक्षलींच्या केंद्रीय समितीचा सदस्य तसेच महाराष्ट्र-मध्य प्रदेश-छत्तीसगड क्षेत्रीय समितीचा प्रमुख म्हणून कार्यरत होता. कॉम्रेड एम, दीपक, सह्याद्री अशा वेगवेगळ्या नावांनी नक्षलवाद्यांमध्ये त्याची ओळख होती.
कोरेगाव भीमा प्रकरणात अटकेत असलेल्या आनंद तेलतुंबडे यांचा मिलिंद तेलतुंबडे भाऊ आहे. भिमा-कोरेगाव हिंसाचाराचा सूत्रधार अशी पोलिसांत त्याची नोंद आहे. १ मे २०१९ रोजी गडचिरोलीत कुरखेडा - जांभुळखेडाज पोलिसांवर झालेल्या हल्ल्यामागे मिलिंद तेलतुंबडेचा हात असल्याचा संशय होता. त्याच्यावर ५० लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.
नक्षलवादी चळवळ शहरी भागात रुजवण्यात त्याचा हात होता. केंद्र सरकारच्या मोस्ट वॉण्टेड नक्षलवाद्यांच्या यादीत त्याचा सहभाग होता. त्याच्यावर हत्या देशद्रोहासह अनेक गुन्हे दाखल होते.
गडचिरोलीच्या जंगलात नेमकं काय झालं?
'सी-६० पोलीस दल' नक्षलविरोधी मोहीम राबवीत असताना नक्षलवाद्यांनी पोलिसांवर बेछूट गोळीबार केला. त्याला पोलिसांनी प्रत्युत्तर दिले. या चकमकीत एक मोठा नक्षलवादी म्होरक्या ठार झाल्याची माहिती आहे. चकमकीत अनेक नक्षलवादी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची जंगलातील शोधमोहीम रात्री उशिरापर्यंत सुरू होती, अशी माहिती सूत्रांनी दिली.
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोटगुल-ग्यारापत्ती जंगल परिसरात गुप्त माहितीच्या आधारे सी-६० नक्षलविरोधी अभियान पथकाने शनिवारी सकाळी शोधमोहीम सुरू केली. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार सुरू केला. त्यांना पोलिसांनी जशास तसे प्रत्युत्तर दिले. चकमक तीन ते चार तास सुरू होती. पोलिसांपुढे निभाव लागत नसल्याचे लक्षात येताच नक्षलवादी जंगलात पसार झाले. त्यांचा शोध घेण्यासाठी ही मोहीम सुरू ठेवण्यात आली आहे.
चकमकीनंतर घटनास्थळावर अतिरिक्त पोलीस कुमक मागविण्यात आली. त्यानंतर नक्षलविरोधी अभियान पथकाने घटनास्थळी शोधमोहीम राबविली. या मोहिमेत दुपारपर्यंत १० ते १२ नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले. मात्र नक्षलविरोधी अभियान पथकाने जंगलात शोध घेतला असता रक्ताचा सडा आढळला. त्यानंतर घनदाट जंगलात शोध घेण्यात आला असता नक्षलवाद्यांचे आणखी १४ मृतदेह आढळले.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री साडेआठ वाजेपर्यंत २६ नक्षलवाद्यांचे मृतदेह घटनास्थळावर ताब्यात घेण्यात आले. ते रात्री उशिरा गडचिरोली येथे आणण्यात आले. मृतदेहांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल, धानोराचे उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव आणि गडचिरोली पोलीस दलातील अन्य अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. या चकमकीत तीन पोलीस जवान जखमी झाले आहेत. त्यांना हेलिकॉप्टरने नागपूर येथे हलवण्यात आले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती पोलीस अधीक्षक गोयल यांनी दिली.
सी-६० कमांडो कोण आहेत?
गडचिरोली जिल्ह्याची निर्मिीती झाल्यापासून येथे नक्षली कारवाया मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. यानंतर १ नोव्हेंबर १९९० रोजी तत्कालीन पोलीस अधिक्षक के पी रघुवंशी यांनी 'सी-६०' ची स्थापना केली होती. त्यावेळी फक्त ६० स्पेशल कमांडो असल्याने या दलात असल्याने 'सी-६०' असं नाव देण्यात आलं होतं.
टिप्पणी पोस्ट करा