Top News

छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा कार्यक्रम भाजपाने केला "हायजॅक" #chandrapur #pombhurna


लीज दिली पण नगरपंचायतच्या सर्वसाधारण सभेत विषयच ठेवला नाही


मुख्याधिकाऱ्याचा अजब कारनामा



पोंभूर्णा:- स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणारे उभ्या महाराष्ट्राचे दैवत असलेले श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे अनावरणाचे कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांचे १३ वे वंशज उदयनराजे भोसले व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार दि.१९ फेब्रुवारीला पोंभूर्ण्यात होत असतांनाच नगरपंचायत चे विरोधी पक्षनेते आशिष कावटवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्मारक समिती असंवैधानिक असून भाजपाने निवडणूका डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवाजी महाराजाच्या आड राहून कार्यक्रम हायजॅक करीत स्थानिक प्रशासनाची फसवणूक केली आहे.




शासनाच्या निधीचा गैरवापर करून दिशाभूल करणाऱ्यावर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अन्यथा या प्रकरणी न्यायालयात धाव घेणार असल्याचे दि.१८ फेब्रुवारी ला पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.



यावेळी बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रती आम्हाला गौरव आहे.कार्यक्रमालाही आमचा विरोध नाही मात्र पुतळा स्मारक समितीने जे भाजपा प्रणित कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचा आम्ही विरोध करीत आहोत असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. पैसा प्रशासनाचा असताना आयोजन मात्र भाजपा प्रणित स्मारक समिती करीत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.जी लीज स्मारक समितीने मिळवली आहे ती लीज देतांना नगरपंचायतच्या सर्वसाधारण सभेत विषयच ठेवण्यात आले नसतांना मुख्याधिकारी यांनी लीजची प्रक्रिया कोणत्या अंधारात केलेली आहे असा सवाल यावेळी कावटवार यांनी उपस्थित केला. यावेळी नगरपंचायतचे विरोधी पक्षनेते आशिष कावटवार, नगरसेवक बालाजी मेश्राम यांची उपस्थिती होती.


छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा व सौंदर्यीकरणासाठी अंदाजे ३५ लक्ष रुपये खर्च करण्यातआले.दि.२२/०८/२०१९ ला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याकरता साहित्य पुरवठ्याचा दर निश्चित करण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला होता.व संपूर्ण कामासाठी रस्ता अनुदान अंतर्गत २४,९३,४३३ रुपये निधी शंभु फायबर आर्ट,शेगाव यांना कामाचे कार्यादेश दि.२७/०१/२०२० ला देण्यात आले होते.त्या अनुषंगाने काम पूर्ण झाले होते.



दि.७/२/२०२३ ला नगराध्यक्ष सुलभा पिपरे यांच्या अध्यक्षतेखाली नगर पंचायतच्या विशेष सभेत शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी चर्चा करून छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष रुषी कोटरंगे यांना लोकवर्गणीतून पुतळा बसविण्यासाठी नाहरकत प्रदान करण्यात आले.व सदर जागा ३ वर्षांकरिता भाडेतत्त्वावर देण्यात आले.करारनाम्यात साक्षीदार म्हणून अजित मंगळगीरीवार,इक्बाल कुरेशी,सुलभा पिपरे,श्वेता वनकर यांची स्वाक्षरी आहे.स्मारक समितीला जी लीज देण्यात आली त्याबाबतचा विषय सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला नव्हता.मग लिज कोणत्या आधारावर देण्यात आली होती.लिज देताना शासनाचे नियम मुख्याधिकाऱ्याने तुडवून अंधारात हे कारनामे केले असल्याचा आरोप आशिष कावटवार यांनी यावेळी केला.


याच करारनाम्याचा आधार घेत जिल्हाधिकारी यांनी दि.७/२/२०२३ ला आदेश देतांना असे स्पष्ट केले आहे की स्मारक समितीकडे सदर आदेशानंतर पुतळा उभारण्याबाबत संपूर्ण खर्च स्मारक समितीने करावा तसेच भविष्यात पुतळ्याची देखभाल व दुरुस्ती या करीता शासनाकडे निधीची मागणी करता येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.असे जिल्हाधिकारी यांनी अटी व शर्ती लागू केले असतांना नगरपंचायतचे मुख्याधिकारी आशिष घोडे यांनी दि.१३/१२/२०२३ ला वार्ड नंबर १४ मधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर व चौकातील सौंदर्यीकरणासाठी आमदार स्थानिक विकास निधीतून ८,२३,१८५ रुपये निधी खर्च करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले.तसेच सदरची कामे पूर्ण झाल्यानंतर त्याची देखभाल व दुरूस्ती नगरपंचायत पोंभूर्णा मार्फत करण्यात येणार असल्याचे प्रमाणपत्र देऊन स्पष्ट केले होते.



स्मारक समिती लीज मिळाल्यानंतर पुतळ्यासाठी स्मारक समिती खर्च करणार असल्याचे करारनाम्यात स्पष्ट केले असतांना यात मात्र समितीकडून फार मोठा गौडबंगाल झाला आहे.वास्तवीक दि.३/३/२०२० ला पुतळ्यासंबंधात कला उपसंचालक(प्र.शा)कला संचालनालय महाराष्ट्र राज्य यांनी पोंभूर्णा येथे उभारण्यात येणारे पुतळ्याचे क्ले माॅडेल तज्ञ प्रतिनिधी कडून केले असल्याचे व ते क्ले माॅडेल कलात्मक दृष्ट्या योग्य झाले असल्याची मान्यता देण्यात आली होती. सर्व सोपस्कार पार पडत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नेमके कुणी खरेदी केला हा गौडबंगाल अजूनही गुलदस्त्यातच आहे.



दि. १९ फेब्रुवारी ला होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वरूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शिष्टाचाराची खिल्ली उडविली आहे. या कार्यक्रमासाठी स्थानिक प्रतिनिधी, अधिकारी यांना डावलून भाजपाच्या पधिकाऱ्यांना पुढे करून कार्यक्रमाचा घाट घातलेला आहे. सदर पत्रिकेत विरोधी पक्षनेते, मुख्याधिकारी यांना स्थानच देण्यात आलेले नाही. तसेच नगरपंचायतचे नगरसेवकांना सुद्धा पाचारण करण्यात आलेले नाही. शासकीय कार्यक्रम असताना स्मारक समितीच्या आड राहून भाजपाने निवडणुकीचा प्रचार करीत असल्याचा आरोप आशिष कावटवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने