चंद्रपूर:- राज्यात सध्या हिंदी आणि मराठी भाषेवरून राजकारण तापले आहे. चंद्रपुरात शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) वतीने महाराष्ट्र सरकारने नुकत्याच जारी केलेल्या एका सरकारी आदेशाच्या (जीआर) विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.
आज, रविवार, २९ जून २०२५ रोजी चंद्रपुरातील गांधी चौकात, दुपारच्या भर पावसातही शिवसैनिकांनी एकत्र येत या 'हिंदी सक्ती' करणाऱ्या सरकारी आदेशाची होळी केली. जिल्हाप्रमुख श्री. संदीप अनिल गिऱ्हे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना गिऱ्हे यांनी महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचा तीव्र निषेध केला. ते म्हणाले की, "महाराष्ट्र सरकारने हिंदी ही भाषा सक्तीची करण्याचा जीआर काढून सर्व मराठी बांधवांवर आणि महाराष्ट्रावर फार मोठा अन्याय केला आहे. आम्ही या महाराष्ट्र सरकारचा जाहीर निषेध करतो."
या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठी बांधव सहभागी झाले होते, त्यांनी एकजुटीची ताकद दाखवून दिली. "हिंदी सक्ती'च्या सरकार निर्णयाची होळी करूया, मराठी माणसाच्या एकजुटीची ताकद दाखवूया!" असा नारा यावेळी देण्यात आला. सध्या सुरू असलेल्या हिंदी आणि मराठी भाषेवरील या राजकारणामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे.