Click Here...👇👇👇

Toll For Two Wheeler: दुचाकी वाहनांना टोल आकारणी नाही

Bhairav Diwase
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
नवी दिल्ली:- गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि काही माध्यमांमध्ये १५ जुलै २०२५ पासून दुचाकी वाहनांना टोल आकारला जाईल अशा बातम्या वेगाने पसरल्या होत्या. महामार्ग नेटवर्कच्या देखभालीसाठी आणि विस्तारासाठी निधीची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी सरकार हा निर्णय घेईल, असेही बोलले जात होते, ज्यामुळे दुचाकीस्वारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र, आता केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. गडकरी यांनी स्पष्ट केले आहे की केंद्र सरकार कोणत्याही दुचाकी गाड्यांवर टोल लावणार नाही आणि या सर्व बातम्या निरर्थक आहेत.

नितीन गडकरी यांचे ट्विट:

नितीन गडकरी यांनी याबाबत ट्विट करत म्हटले आहे की, "दुचाकी वाहनांकडून टोल वसूल करण्याच्या बातम्या दिशाभूल करणाऱ्या आहेत. असा कोणताही निर्णय प्रस्तावित नाही आणि दुचाकी वाहनांचा टोल पूर्णपणे माफ राहील. सत्य जाणून न घेता दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवून खळबळ निर्माण करणे हे चांगल्या पत्रकारितेचे लक्षण नाही. मी त्याचा निषेध करतो." गडकरींच्या या ट्विटमुळे हे स्पष्ट झाले आहे की देशातील कोणत्याही दुचाकी वाहनांकडून टोल कर वसूल केला जाणार नाही, ज्यामुळे दुचाकीस्वारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) स्पष्टीकरण:

दुसरीकडे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने (NHAI) सुद्धा त्यांच्या 'X' हँडलवर दुचाकी टोलबाबतच्या वृत्ताचे खंडन केले आहे. NHAI ने म्हटले आहे की, "काही माध्यमांमध्ये असे वृत्त आले आहे की भारत सरकार दुचाकी वाहनांवर वापरकर्ता शुल्क आकारण्याची योजना आखत आहे. NHAI स्पष्ट करू इच्छिते की असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही. दुचाकी वाहनांसाठी टोल शुल्क आकारण्याची कोणतीही योजना नाही."

सध्याची टोल कर प्रणाली:

भारतात दुचाकी वाहनांकडून कोणत्याही प्रकारचा टोल कर वसूल केला जात नाही. सध्या देशात ४ चाकी आणि त्यापेक्षा जास्त चाके असलेल्या वाहनांना टोल कर भरावा लागतो. तसेच, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, संरक्षण सेवा वाहने, व्हीआयपी वाहने यांसारख्या आपत्कालीन सेवांशी संबंधित वाहनांनाही टोल कर भरण्यापासून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे.