चंद्रपूर:- चंद्रपूरच्या राजकारणात सध्या मोठा भूकंप झाला आहे. ज्या नेत्याने शून्यातून विश्व निर्माण करून जिल्ह्यात काँग्रेसला संजीवनी दिली, त्या दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनानंतरही त्यांच्या कुटुंबाचा छळ थांबताना दिसत नाहीये. धक्कादायक बाब म्हणजे, हा त्रास बाहेरील विरोधकांकडून नाही, तर स्वपक्षातीलच काही नेत्यांकडून दिला जात असल्याचा खळबळजनक आरोप आता होत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसला पुन्हा उभारी देणाऱ्या बाळू धानोरकर यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आणि विद्यमान खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या मार्गात स्वपक्षातीलच काही नेते काटे पेरण्याचे नीच राजकारण करत आहेत. विधवा लोकप्रतिनिधीचे राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी सरसावली आहे, असे मत आता जनमानसातून व्यक्त होत आहे.
विक्रमी विजय तरीही विरोध?
प्रतिभाताईंनी लोकसभेत २ लाख ५० हजारांचे विक्रमी मताधिक्य घेऊन विरोधकांचे दात घशात घातले. केवळ लोकसभाच नाही, तर जिल्ह्यातील नगरपरिषदांवरही काँग्रेसचा झेंडा फडकवून त्यांनी आपली ताकद सिद्ध केली. मात्र, तरीही नेत्यांचा अहंकार शमत नसल्याने ते आता खालच्या पातळीवरचे राजकारण करून जिल्ह्याचे वातावरण गढूळ करत आहेत.
महानगरपालिकेत गटबाजीचे विष?
चंद्रपूर महानगरपालिकेत २७ नगरसेवकांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे. पण सत्तेच्या हव्यासापोटी या 'बांडगूळ' नेत्यांनी गटबाजी सुरू केली आहे. स्वतःची संख्या वाढवण्यासाठी दुसऱ्या गटाचे ५ नगरसेवक पळवण्यापर्यंत यांची मजल गेली आहे. विशेष म्हणजे, प्रतिभाताईंची कोंडी करण्यासाठी हे नेते चक्क भाजपशी हातमिळवणी करायलाही मागेपुढे पाहत नसल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.
शाहू-फुले-आंबेडकरांचे विचार आणि सद्यस्थिती:
महाराष्ट्र हे शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचे राज्य आहे. अशा राज्यात एका १००% ओबीसी असलेल्या महिला खासदाराला त्रास देणे हे संस्कृतीला काळीमा फासणारे आहे. चंद्रपूर हे कार्यक्षेत्र नसतानाही येथे लुडबूड करू नये असे विधान काही दिवसा पहिले खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले होते. या प्रवृत्तींचा 'मुखवटा' फाडण्याची वेळ आता बहुजन समाजाने घेतली आहे. बाळूभाऊंच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांना आणि बहुजन नेतृत्वाची गळचेपी करणाऱ्यांना चंद्रपूरकर धडा शिकवणार का? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरेल.

