Chandrapur News: जिल्ह्यात वाघिणीचा मृत्यू; हल्ल्यात वनरक्षक जखमी, तीन बछडे बेपत्ता!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- वाघिणीने प्रथम बैलाची शिकार केली, त्यानंतर कर्तव्यावर असलेल्या वनरक्षकावर हल्ला करून त्यांना जखमी केले आणि अवघ्या एका तासाच्या अंतराने ती वाघीण मृतावस्थेत आढळल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर शेत शिवारातील घटना आहे.


एक पट्टेदार वाघीण आणि तिचे तीन बछडे शेतात फिरताना दिसून आले. याची माहिती परिसरात पसरताच गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली, ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. वनरक्षकावर वाघिणीने हल्ला केल्याने वनरक्षक सज्जन पारेकर गंभीर जखमी झाले त्यात त्यांच्या मांडीला गंभीर दुखापत झाली असून उजव्या हात फॅक्चर झाला त्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी चंद्रपूर रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वन अधिकारी घटनास्थळी दाखल झाली.


वनरक्षकावर हल्ला केल्यानंतर तासभरात एका धान पिकाच्या शेतात ही वाघीण मृतावस्थेत आढळून आली. एका बाजूला वाघिणीची दहशत आणि दुसरीकडे तिचा झालेला अचानक मृत्यू, तर तिसरीकडे तिच्या आईविना पोरक्या झालेल्या तिन बछड्याचा प्रश्न यामुळे वनविभागासमोर आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. वाघिणीसोबत असलेले तीन बछडे सध्या कुठे आहेत, याबाबत वनविभागाला शोध घ्यावा लागणार आहे. वाघिणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला. तिला काही अंतर्गत इजा होती की अन्य काही कारण, याचा तपास आता वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी करत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.