Top News

शेतकऱ्यांच्या हरितक्रांतीचे स्वप्न साकारणार.


(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यातील गोवरी येथील नाल्यावर १४ वर्षापूर्वी मंजूर झालेल्या बंधाऱ्याचे बांधकाम निधीअभावी रखडले होते. मात्र शेतकऱ्यांच्या सततच्या पाठपुराव्याला यश आल्याने सुधारीत अंदाजपत्रक तयार करुन ६७ लाखांचा निधी उपलब्ध झाला असून बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे जवळपास तीनशे हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार असून उन्हाळ्यातील पाणीटंचाई दूर होण्यास मदत होण्याची आशा आहे.
बल्लारपूर वेकोलि क्षेत्रातंर्गत गोवरी परिसर कोळसा खाणींने वेढला आहे. त्यामुळे भुजल पातळी झपाट्याने खाली जात असून पाणी टंचाईचे स्वरूप गंभीर होत आहे. शेती सिंचनाखाली आणण्यासाठी माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या कार्यकाळात बंधाऱ्याच्या बांधकामाला मंजुरी मिळाली.

तर माजी आमदार अ‍ॅड. वामनराव चटप यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. सुभाष धोटे यांच्या कार्यकाळात बांधकामाला सुरुवात झाली. मात्र निधीअभावी बांधकाम रखडले. माजी आमदार अ‍ॅड. संजय धोटे सुधारित बांधकामासाठी प्रधानमंत्री खनिज विकास निधी अंतर्गत स्थानिक लोकप्रतिनिधी पाठपुरावा केला. त्यानंतर अर्धवट बंधाऱ्याच्या सुधारित बांधकामासाठी लघु सिंचाई विभागाने ६७ लाखांचा अंदाजपत्रक तयार केला. व माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला. त्यानंतर बंधाऱ्याच्या सुधारित बांधकामाला सुरुवात झाली आहे. तब्बल १४ वर्षाच्या कालखंडानंतर बंधारा पूर्णत्वास येत आहे. या प्रकल्पामुळे जवळपास तीनशे एकर जमीन ओलिताखाली येईल, भुजलपातळीत वाढ होण्याची अशा व्यक्त होत आहे.

कोळसा खाणींमुळे पाण्याची पातळी घटली
बल्लारपूर वेकोलि क्षेत्रातील गोवरी, पोवनी, गोयेगोव, चिंचाली, साखरी, बाबापूर, सास्ती परिसरातील नाले दिवाळीनंतरच कोरडे पडत आहे. गोवरी गावालगतच मोठा नाला वाहतो वेकोलित मोठया प्रमाणावर पाण्याचा उपसा होत असल्यामुळे परिसरातील पाण्याची पातळी झपाटयाने खाली गेली आहे .

१४ वर्षापासून गोवरी बंधाऱ्यांचे बांधकाम रखडले होते. त्यासाठी अनेकदा सबंधित विभागाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर ६७ लाखांचा निधी मंजूर झाला असून या बंधाऱ्यांचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आल्याने शेतकऱ्यांच्या हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
सुनील ऊरकुडे सभापती,
कृषी व पशुसंवर्धन जि. प. चंद्रपूर

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने