स्मार्टफोन हे बेरोजगारीच खेळणं जे व्यसन बनून मानवी समाजात पसरत आहे
दारूचे व्यसन, तंबाखू, गुटखा, सिगारेट चे व्यसन हे शब्द नेहमी आपल्या कानावर पडतात. परंतु सध्या ह्या सर्व व्यसनात आता इंटरनेटचे व्यसन याचा समाविष्ट झाला आहे. दारू, तंबाखू, सिगारेट यांचे व्यसन करणाऱ्यांचा एक विशिष्ट वयोगट आणि लोक आहेत पण इंटरनेटच्या व्यसनात लहानग्यापासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्व मानवी जीवन व्यसनी झाला आहे.
आधी फोन स्मार्ट नव्हता पण लोक मात्र स्मार्ट असायची. आता फोन स्मार्ट झाला आणि मानवाची विचार करण्याची शक्ती गमावून बसला. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करण्यासाठी शाळेत शिकवलेले गुरुजींचे सूत्र लक्षात असायचे. स्मार्ट मोबाइल मुळे डोक्यातील गणितांच्या सूत्रांची विसर पडली आहे. आता बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार सर्व स्मार्टफोनच करतो आणि आपण बुद्धीजीवी प्राणी म्हणून ओळखला जाणारा माणूस प्राणी बुद्धिहीन प्राणी होताना दिसत आहे.
सरकारने, मोबाईल कंपन्या आणि विविध नेटवर्क प्रोव्हाइडर कंपन्यांनी रोज दीड जीबी डाटा देऊन बेरोजगारीच खेळण हातात दिलं आहे. जे व्यसन बनुन मानवी समाजात पसरत आहे. ज्या मोबाईल फोनचा वापर फक्त एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीसोबत बोलण्यासाठी व्हायचा, तोच मोबाईल आता स्मार्ट झाल्यामुळे मानवी व्यक्तीच्या मेंदूची कार्यक्षमता कमी होत चाललेली आहे.
मोबाईल मुळे नवीन पिढीकडे वेळच उरला नाही. दिवसभर रोज दीड जीबी डेटा यातच वर्तमान खर्च करत आहे. मोबाईल येण्याच्या अगोदर नवीन पिढी कार्यक्षम होती. समाजात काय घडत आहे याकडे लक्ष असायचं, खेळ खेळायचे, पुस्तके वाचायची, कविता लिहायचे, नाटक, नृत्य, संगीत, चित्रकला अशा विविध क्षेत्रात नवनवीन रत्न तयार व्हायचे. समाजात घडत असलेल्या विघातक कृत्यांचा विरुद्ध आवाज उठवायचे. सरकारचा खरा विरोधी पक्ष म्हणून काम करायचे. परंतु आता नवीन पिढीला सोशल मीडिया, व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, गेम यापासून वेळच मिळत नाही. म्हणून म्हणावं लागतं की, इंटरनेट हे फार मोठे व्यसन आहे. जे वर्तमान आणि भविष्यातील सर्व पीढी यांच्या आयुष्याची राखरांगोळी करणार आहे.
नवीन येणाऱ्या टेक्नोलॉजीचा वापर करू नये याला माझा अजिबात विरोध नाही. पण टेक्नॉलॉजीचा वापर कसा, कुठे आणि कशासाठी करायचा हे मात्र ओळखण्याची, समजण्याची गरज आहे. एकाच कुटुंबातील व्यक्ती एकाच घरात बसले तरी आपआपसात संवाद होत नाही आणि सर्व हातात मोबाईल घेऊन टाईमपास करताना दिसतात. परिवारातील संवाद कमी झाल्यामुळे आपलेपणाची भावना, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा संपुष्टात आला आहे. एकमेकांच्या अडचणी, प्रेम व्यक्त होत नाही. सर्व व्यक्ती मोबाईलच्या दुसर्याच विश्वात जगत आहेत.
पूर्वी नोकरी करणारा पालक वर्ग आपले रोजचे काम करून आले की, मुलांसोबत, पत्नींसोबत, आई-वडिलांसोबत चर्चा करायचे. परंतु स्मार्टफोनमुळे कामाचे तास पूर्ण करून घरी आल्यानंतरही कार्यालयीन अधिकारी व्हाट्सॲप ग्रुप बनवून कार्यालयाच्या वेळेनंतर ही काम नोकर वर्गांना देतात. याचं स्मार्टफोनमुळे आठ तास असणारी सेवा ही २४ तासांची झालेली आहे. या कारणांमुळे पती-पत्नीमध्ये भांडण, घटस्पोट, आत्महत्या यासारखे प्रकार समाजात वाढले आहे.
याच स्मार्टफोन आणि इंटरनेटमुळे चोरी, फसवणूक, आर्थिक फसवणूक आणि विविध गुन्हे रोज पाहायला मिळत आहे. तरी देखील मोबाईलच्या नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना याचे भान उरले नाही.
आता या पिढीला सावरायला हवे, पालकांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची खरी वेळ आता आली आहे. जर आज खबरदारी, जिम्मेदारी स्वीकारली नाही तर भविष्यात आपल्या पाल्याला नशा मुक्ति केंद्रामध्ये पाठवण्याची वेळ नक्की येईल आणि असे व्यसनमुक्ती केंद्र तयार करण्याची वेळ सरकारवर येईल. आता जाग होण्याची गरज आहे, विविध समाज माध्यमातून याविषयी जागरूक होऊन मोबाईल आणि इंटरनेटच्या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी ठोस पाऊल उचलणे गरजेचे आहे. कारण यातूनच एक मजबूत नवीन पिढी समाजाला आणि देशाला मिळेल.
ग्राहक पंचायत, भद्रावती