मुंबई:- मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये. या पार्श्वभुमीवर वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. या धरतीवर त्यांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे Dhananjay Munde आणि पंकजा मुंडे pankaja munde यांनी आंदोलन स्थळी सोमवारी (दि.17) भेट दिली.
या प्रसंगी पंकजा मुंडे म्हणाल्या की, पुरोगामी महाराष्ट्रात लोकशाहीमार्गाने आंदोलन करणे योग्य आहे. सरकारने कायद्याच्या चौकटीत राहून प्रत्येकाला समान न्याय दिला पाहिजे. सरकारने एका आंदोलनाला एक दुसऱ्या आंदोलनाला वेगळा न्याय सरकारकडे नसला पाहिजे. सरकारने आवाज ऐकुन ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागणार नाही यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी श्वेत पत्रिका काढून देणे गरजेचे आहे. ओबीसी आंदोलनाबाबत सरकारची भावना वेगळी आहे. ती तशी नसली पाहिजे असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
उपोषणकर्त्यांनी जलत्याग केलेला आहे त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. शासनाची भूमिका माय-बापाची असावी. सर्व वर्गांना, सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी. समान न्यायाची अपेक्षा मायबाप सरकारकडून असते. यांच्या उपोषणाकडे गांभीर्याने पहावे, तसेच डोंगर, कपाऱ्यात जावून जीवन बनवणारा हा माझा वंचित समाज आहे.
या समाजाचा काय आवाज आहे, तो आवाज सरकारने ऐकायलाच पाहिजे, अशी माझी मागणी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माझी विनंती आहे, ओबीसींच्या आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही ते आम्हाला समजावून सांगा. मराठा आरक्षणाला आमचा विरोध असण्याचं कारणच नाही. पण चुकीच्या पद्धतीने सर्टिफिकेट दिले जात असतील तर ते मान्य नाही. सरकारने या दोन्ही जणांचे उपोषण सोडवण्यासाठी यावं. ज्याप्रकारे इतरांचं उपोषण सोडवलं जातं त्याचप्रमाणे यांचं उपोषण सोडवलं जावं अशी मागणी देखील पंकजा मुंडे यांनी केली.
कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, उपोषणकर्त्यांच्या मागण्या उद्या होणाऱ्या मंत्रीमंडाळाच्या बैठकीत सरकार मांडणार असुन, सरकाराची नेहमी भूमिका ओबीसीच्या आरक्षणाला धक्का बसणार नाही अशीच असेल. याबद्दल सरकारने भुमिका स्पष्ट केली पाहिजे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी गैरसमज दूर केले पाहिजेत तसेच हा प्रश्न लवकरच कारणी लावला पाहिजे.