गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर चामोर्शी तालुक्यापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिचडोह बॅरेजचे सर्व 38 दरवाजे येत्या 1 जून 2025 पासून पाण्याच्या येवानुसार टप्प्याटप्प्याने उघडण्यात येणार आहेत. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सून सुरू झाल्याने आणि पूर नियंत्रणाच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. बॅरेजमध्ये साठवलेला पाणीसाठा कमी करण्यासाठी ही प्रक्रिया आवश्यक असल्याचे जलसंपदा विभागाने कळवले आहे.
चिचडोह बॅरेजचे बांधकाम जून 2018 मध्ये पूर्ण झाले असून, त्याची एकूण लांबी 691 मीटर आहे. यामध्ये 15 मीटर लांब आणि 9 मीटर उंचीचे असे एकूण 38 लोखंडी उभे उचल दरवाजे बसविण्यात आले आहेत. गेल्यावर्षी 15 ऑक्टोबर 2024 पासून हे सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते. सद्यस्थितीत, 27 मे 2025 रोजी चिचडोह बॅरेजमधील पाणी पातळी 183.00 मीटर असून, जिवंत साठा 53.52 दशलक्ष घनमीटर इतका आहे. या नियोजनानुसार, 1 जून 2025 रोजी सकाळी 8 वाजता प्रकल्पाच्या उभ्या उचल द्वारातून 88.04 क्युमेक्स विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.
त्यामुळे नदीच्या खालील भागातील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. या वाढत्या पाणी पातळीमुळे कोणतीही जीवित व वित्तहानी होऊ नये यासाठी नदीलगतच्या सर्व गावांना आणि ग्रामपंचायतींना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या कालावधीत नदीकाठावर जाणे टाळावे, तसेच नदीकाठावरील शेतात काम करताना योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
विशेषतः मार्कंडा देवस्थान येथील नदीवर स्नान करणारे यात्रेकरू, मासेमारी करणारे नागरिक, नदीघाटातून वाळू काढणारे, पशुपालक आणि नदीतून ये-जा करणार्या सर्व जनतेने आवश्यक ती खबरदारी घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असेही आवाहन चिचडोह बॅरेज प्रशासनाने केले आहे.