चंद्रपूर:- आज एका अत्यंत महत्त्वाच्या आणि प्रेरणादायी उपक्रमाचा, "अम्मा की पढ़ाई" चा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा उपक्रम खरंच अनेक तरुणाईच्या स्वप्नांना पंख देणारा ठरणार आहे.
आज चंद्रपूरमध्ये "अम्मा की पढ़ाई" या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत २८४ विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मोफत आणि दर्जेदार शिक्षण मिळणार आहे.
आपल्या समाजात अनेक विद्यार्थी असे आहेत जे बुद्धीमान आहेत, त्यांच्यात प्रचंड जिद्द आहे आणि अधिकारी होण्याचं स्वप्न ते उराशी बाळगून आहेत. पण अनेकदा परिस्थिती, गरिबी, योग्य मार्गदर्शनाचा अभाव आणि आवश्यक साधनांची कमतरता यामुळे त्यांची ही स्वप्नं अपुरी राहतात. "अम्मा की पढ़ाई" हे केंद्र आता अशाच गरजू आणि प्रतिभावान विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण बनले आहे.
आईच्या नावाने सुरु करण्यात आलेला हा उपक्रम खऱ्या अर्थाने अनेक माता-पितांची स्वप्नं पूर्ण करणारा ठरणार आहे. या केंद्रातून उद्याचे अधिकारी घडतील, असे दर्जेदार शिक्षण देण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला आहे. "अम्मा की पढ़ाई" हे केंद्र भविष्यात अधिकारी घडविणारे एक सक्षम केंद्र ठरेल, यात शंका नाही.
या महत्त्वपूर्ण प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर भैय्या, जिल्हाधिकारी विनय गौडा, चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किर्तीकुमार भांगडिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंग, महसूल विभागाचे संजय पवार, महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, ओबीसी नेते अशोक जिवतोडे, प्रा. राजेश दहेगावकर, भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोटूवार, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते आणि त्यांनी उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.