मुंबई:- राज्याचे माजी सांस्कृतिक कार्य मंत्री आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टीपूर्ण प्रस्तावाला जागतिक पातळीवर मान्यता मिळाली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून कार्यरत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश व्हावा, यासाठी पुढाकार घेत प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावास युनेस्कोने मंजुरी दिली असून, महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा एकूण १२ किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा यादीत करण्यात आला आहे. या ऐतिहासिक निर्णयासाठी आ. मुनगंटीवार यांनी देशगौरव पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांचे आभार मानले असून, हा निर्णय आ.मुनगंटीवार यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असलेल्या निस्सीम श्रद्धेचे फलित असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
छत्रपती शिवरायांच्या शौर्य, कर्तृत्व आणि पराक्रमाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीवर महाराजांनी बांधलेल्या व त्यांचे वास्तव्य असलेल्या किल्ल्यांना जागतिक ओळख मिळावी, यादृष्टीने आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रस्ताव पाठवला होता. सांस्कृतिक कार्य मंत्री असताना त्यांनी ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ (Maratha Military Landscape of India) या संकल्पनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावावर युनेस्कोने मोहोर उमटवून सर्व बारा किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करून घेतला आहे. या ऐतिहासिक निर्णयासाठी देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच अप्पर मुख्य सचिव विकासजी खारगे आणि भारतीय पुरातत्व खात्याचेही मनःपुर्वक आभार आ. मुनगंटीवार यांनी मानले आहेत.
यामध्ये महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी या किल्ल्यांचा तर तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्याचा समावेश आहे. युनेस्कोची यादी जाहीर झाल्यानंतर आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया नोंदवली. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी, त्यांचे कार्यकर्तृत्व जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याच्या भावनेने मी हा प्रस्ताव पाठवला होता. आज त्याचे फलित पाहून मन अभिमानाने भरून आले आहे,’ असे ते म्हणाले आहेत. ‘छत्रपतींनी रयतेसाठी अर्पण केलेले स्वराज्य वैभव संवर्धित करण्यासाठी मला खारीचा वाटा उचलता आला याचे आत्मिक समाधान आहे. त्यांच्या विचारांचे पाईक होऊन शेवटच्या श्वासापर्यंत हे ईश्वरीय कार्य करत राहील,’ असा निर्धारही त्यांनी आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षानिमित्त श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला होता. त्याचवेळी देशभरातील विविध राज्यांमधून केंद्र सरकारकडे प्रस्ताव आले होते. मात्र श्री. मुनगंटीवार यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. त्यानंतर केंद्र सरकारकडून महाराष्ट्राचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठविण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे रणझुंजार कर्तृत्व आणि त्यांच्या शौर्याचे साक्षीदार ठरलेले हे सर्व किल्ले जागतिक वारसा स्थळाच्या यादीत यावे, असा त्यामागचा उद्देश होता. युनेस्कोच्या वतीने सांस्कृतिक (कल्चरल) आणि नैसर्गिक (नॅचरल) अशा दोन कॅटेगरीमध्ये जागतिक वारसा स्थळांची यादी जाहीर केली जाते. यात या किल्ल्यांना सांस्कृतिक निकषात समाविष्ट करण्याची शिफारस केंद्र सरकारने केली आहे. वैशिष्ट्यपूर्ण व अपवादात्मक सांस्कृतिक परंपरांची साक्ष देणाऱ्या वास्तूंचा या गटात समावेश केला जातो. यासोबतच मानवी शौर्याचा इतिहास सांगणाऱ्या या किल्ल्यांचे आर्किटेक्चर, इमारतीचे बांधकाम आणि त्यांची तांत्रिक बाजू देखील यामध्ये ग्राह्य धरली जाते.
२०२१ मध्ये युनेस्कोने ‘मराठा लष्करी रणभूमी परिसर’ संभाव्य जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केला होता. त्यानंतर आता भारतातील ४२ जागतिक वारसा स्थळांमध्ये युनेस्कोने मराठा लष्करी रणभूमी परिसरातील ११ किल्ल्यांचा समावेश करावा, असा प्रस्ताव केंद्र सरकारने युनेस्कोकडे सादर केला होता. त्यानुसार युनेस्कोने हा प्रस्ताव स्वीकारला आहे.
राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षाचा उत्सव ठरला ऐतिहासिक
राज्याचे माजी सांस्कृतिक कार्य मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या अफलातून कार्यशैलीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. त्यांनी घेतलेल्या अनेक ऐतिहासिक निर्णयांमुळे ऐतिसाहिक वारसा आणि परंपरेचे जतन करण्याच्या दृष्टीने सरकारने पाऊल टाकले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५०वे वर्ष साजरे करताना सांस्कृतिक कार्यक्रमांसह ऐतिहासिक परंपरेचे जतन करण्याच्या दृष्टीने देखील त्यांनी पुढाकार घेतला होता.
महाराजांची वाघनखे भारतात आणली आणि अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण हटवले
महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखे ब्रिटनच्या संग्रहालयातून भारतात आणण्याची जिद्द त्यांनी बाळगली. सातत्याने पाठपुरावा करून ब्रिटन सरकारसोबत त्यांनी सामंजस्य करार देखील केला. आज ही वाघनखे दर्शनासाठी भारतात आहेत. यासोबतच जम्मू-काश्मीर मधील कुपवाडा येथे मराठा इन्फन्ट्री सैन्य दलाच्या सहकार्याने ‘आम्ही पुणेकर’ या संस्थेमार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाकिस्तानच्या दिशेने तलवार धरलेल्या पुतळ्याचे देखील अनावरण झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या श्रीशैलममध्ये तपश्चर्या केली, तिथे महाराजांचे एक छोटे मंदिर होते. आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकारानंतर तिथे भव्यदिव्य मंदिर उभारले गेले. २९ जुलै १९५३ नंतर पहिल्यांदा अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण हटवण्यात आले. हा धाडसी निर्णय घेऊन त्यावर अंमलबजावणी करण्याचे कामही आ. श्री. मुनगंटीवार यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळातच झाले, हे विशेष.