Click Here...👇👇👇

Sudhir Mungantiwar : पक्षात माझी कोंडी होत नाही, पण.; सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?

Bhairav Diwase

नागपूर:- सध्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. एकीकडे मराठी भाषा, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि इतर काही प्रश्नांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करू पाहत आहेत. अशामध्ये फक्त विरोधकच नव्हे तर सत्ताधारी पक्षातील भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार हेदेखील अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच अनेक सवाल उपस्थित करत आहेत. यावरून स्वतः भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "शेतकरी आणि गोरगरिबांचे प्रश्न मांडणे यात काहीही गैर नाही. मंत्रीपद असणे किंवा नसणे हे महत्त्वाचे नाही. मात्र काही जणांना असे वाटत असेल की, यामुळे माझी कोंडी होत आहे, तर तो त्यांचा गैरसमज आहे." असे स्पष्टीकरण दिले आहे. 

"गेली अनेक वर्ष आम्ही विरोधात असतानाही प्रश्न मांडले जात होते. त्याचा मंत्रिपदाशी काहीही संबंध नाही. गोरगरिबांचे प्रश्न मांडण्यासाठीच राजकीय पक्षाची स्थापना झाली आहे. काही कंपन्याना सरकार सबसिडी देत असताना त्या सबसिडी सोबत खत देणे हा गुन्हा आहे. या संदर्भात चंद्रपूरला तक्रार केली आहे. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक शेतकऱ्यांची बाजू घेत गुन्हा दाखल करून घेतला. जीवनावश्यक वस्तू कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे," असे आमदार मुनगंटीवार म्हणाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आलेल्या ऑफरवर उत्तर देताना नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले.

"उद्धव ठाकरे हे भाजपवर टीका करणार नाहीत, अशी अपेक्षा करणेच चुकीचे आहे. उद्धव ठाकरे राज्याच्या प्रगतीसाठी काही विषय मांडतील, शोषित पीडित जनतेसाठी काही विषयांची मांडणी करतील ही अपेक्षाच नाही." असे म्हणत आमदार मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. "दोन भाऊ एकत्र आल्याचे स्वागतच आहे. पण, त्यांनी कोणत्या मुद्द्यावर एकत्र यायचे हा त्यांचा विषय आहे. दोन भाऊ एकत्र आल्याने आम्ही आमचा अभ्यास काही कमी करणार नाही, मेरीटच्या विद्यार्थ्याला याची चिंता करायची गरज नाही," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच, मराठी-अमराठी संघर्ष निर्माण करुन भाजपने सत्ता मिळवली हे म्हणणे म्हणजे उद्धव ठाकरेंचा वेगळ्याच दिशेला विषय घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे, असेही पुढे ते म्हणाले.