Accident News: एक दुचाकी, चार मित्र अन् भरधाव मालवाहू वाहनाची धडक, चौघांचा दुर्दैवी अंत

Bhairav Diwase
जळगाव:- जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यावर मंगळवारी रात्री झालेल्या एका भीषण रस्ते अपघातामुळे शोककळा पसरली आहे. पहूर-जामनेर रस्त्यावर पिंपळगाव गोलाईत गावाजवळ एका भरधाव मालवाहू वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात जामनेर शहरातील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला.


जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात झालेल्या या अपघातात चार तरुणांचा बळी गेला. एकाच दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या या मित्रांवर भरधाव मालवाहू वाहनाच्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे काळाने घाला घातला. रात्री अंदाजे १०.३० वाजता पहूर-जामनेर रस्त्यावरील पिंपळगाव गोलाईत येथील धोकादायक वळणावर हा अपघात झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेरहून पहूरकडे जाणारे मालवाहू वाहन ट्रक वळणावर वेगात आले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला थेट धडक दिली. या धडकेमुळे दुचाकी आणि त्यावरील तरुण अक्षरशः रस्त्यावर फेकले गेले. त्यांना डोक्याला आणि छातीला गंभीर मार लागल्याने जागीच जीव गमवावा लागला.

यात अतुल चंद्रकांत सुरवाडे, अंकुश सुरेश लोखंडे, अजय फकिरा साबळे आणि रवी सुनील लोंढे या चार जणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण २० ते २२ वयोगटातील मित्र होते. ते जामनेर शहरातील जामनेरपुरा आणि भीमनगर येथील होते. चारही जण मित्र असून त्यांच्या अचानक जाण्याने जामनेर शहरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रपरिवाराला या घटनेमुळे मोठा धक्का बसला आहे.

उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

याप्रकरणी पहूर पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे. या अपघातात मालवाहू वाहनाचा चालक जुबेर कुरैशी हा देखील जखमी झाला आहे. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पहूर पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी पोहोचले. ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी चारही मृतदेह जामनेर शासकीय रुग्णालयात हलवले.

पहूर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून अपघाताला जबाबदार असलेल्या मालवाहू वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या भीषण अपघाताच्या प्रत्यक्ष कारणांचा आणि चालकाच्या निष्काळजीपणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत.