भद्रावती:- भद्रावती नगर पालिकेत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल धानोरकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शनिवारी जाहीर सभा घेतली. मुख्यमंत्र्यांच्या जाहीर सभेत आत्महत्याग्रस्त शेतकरी परमेश्वर मेश्राम यांच्या कुटुंबाने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल धानोरकर यांच्या विरोधात निषेधाचे फलक दाखवून निदर्शने केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या सर्व प्रकारामुळे मुख्यमंत्री अस्वस्थ झाले.
भद्रावती व वरोरा नगर पालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या भाजपा उमेदवार अनुक्रमे अनिल धानोरकर व माया राजूरकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 'जाहीर सभा' आज शनिवार २९ नोव्हेंबर रोजी पार पडली. या सभेदरम्यान आत्महत्या करणारे परमेश्वर मेश्राम यांच्या कुटुंबातील सदस्यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या विरोधात फलक दर्शवून निदर्शने केली. विशेष म्हणजे या सभेस राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, वरोरा विधानसभेचे आमदार करण देवतळे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व भद्रावती निवडणूक प्रभारी रवींद्र शिंदे, उद्योजक रमेश राजूरकर, अशोक जिवतोडे, तसेच भाजपाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांची सभा सुरू होताच परमेश्वर मेश्राम या दलित कुटुंबातील सदस्यांनी हातात फलक घेऊन निदर्शने केली. भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल धानोरकर यांनी परमेश्वर मेश्राम या दलित कुटुंबाची शेती हडपल्याने त्यांना तहसील कार्यालयात विष प्राशन करून आत्महत्त्या करावी लागली होती. त्यामुळे त्यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी या कुटुंबाची आहे.
अनेक महिने लोटून देखील न्याय न मिळाल्याने मुख्यमंत्री शहरात आल्याचे औचित्य साधत मेश्राम कुटुंबीयांनी जाहीर सभेत आमची जमीन हडपणाऱ्या धानोरकर परिवाराचा निषेध, माझ्या वडिलांना आत्महत्या करायला लावणाऱ्या व जमीन हडपणाऱ्या अनिल धानोरकर यांचेवर गुन्हे दाखल करा, असे लिहिलेले फलक दाखवून निदर्शने केली. या सर्व प्रकारामुळे मुख्यमंत्री अस्वस्थ झाले.
विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर सभेतील भाषणात भद्रावती नगर पालिकेत दहा वर्ष नगराध्यक्ष व पाच वर्ष उपाध्यक्ष राहिलेले अनिल धानोरकर यांनी मोठी विकासकामे केल्याचे सांगत कौतुकाचा वर्षाव करीत असतानाच या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांनी धनोरकर यांच्या विरोधात निदर्शने करणारी फलक झळकाविल्याने चांगलीच खळबळ उडाली .दरम्यान या घटनेनंतर मुख्यमंत्री काय भूमिका घेतात व प्रशासन दखल घेईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

