
चंद्रपूर:- राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावरून तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन केंद्र येथून प्राप्त माहितीनुसार 11 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 4.45 वाजता सौम्य भूकंपाच्या धक्क्याची नोंद झाली. या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.4 एवढी नोंदविण्यात आली. याचा केंद्रबिंदु चंद्रपूर जिल्ह्यातील हार्दोना (ता. राजुरा) गावाजवळ असल्याचे कळते. सदर धक्का हा अती सौम्य प्रकारचा आहे . या धक्क्यामुळे कुठलीही जीवित व वित्त हानी झाली नाही. याबाबत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी केले आहे.
या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सतर्क राहावे, मात्र कोणत्याही प्रकारची भीती बाळगू नये. सध्या उपलब्ध माहितीनुसार कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची नोंद नाही. तसेच नागरिकांनी अफवा, खोटे फोन कॉल, अथवा अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही माहिती अधिकृत स्त्रोतांकडूनच घ्यावी. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

