अपघात रोखण्यासाठी चंद्रपूर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
चंद्रपूर:- शहरातील वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आता जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि महानगरपालिका पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. शहरात वाढणाऱ्या अपघातांना रस्त्यांवरील अवैध अतिक्रमण सुद्धा तितकेच कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर, चंद्रपूर पोलीस, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांनी एकत्र येत समन्वय साधला असून, शहरात अतिक्रमणांविरोधात एक अत्यंत कडक मोहीम राबवली जाणार आहे.
चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी या मोहिमेबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. शहरात ज्या दुकानदारांनी आणि व्यावसायिकांनी रस्त्यांवर किंवा सार्वजनिक जागेवर अतिक्रमण केले आहे, अशा अनेक दुकानदारांना प्रशासनाच्या वतीने अधिकृत नोटीस बजावण्यात आल्या आहेत. ही नोटीस मुदतीत न पाळल्यास थेट दंडात्मक आणि जप्तीची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.
दरम्यान, या मोहिमेची सुरुवात शहरात आधीच पाहायला मिळत आहे. अनेक शोरूम मालकांनी आणि बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या इमारतीचे साहित्य थेट रस्त्यावर आणून टाकल्याचे निदर्शनास आले होते, ज्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. याची गंभीर दखल घेत रामनगर पोलिसांनी अशा बेजबाबदार शोरूम धारकांवर आणि बांधकाम साहित्यांवर तात्काळ धडक कारवाई केली आहे.
चंद्रपूर शहर अपघातमुक्त आणि सुंदर करण्यासाठी प्रशासनाने उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. आता या संयुक्त मोहिमेमुळे चंद्रपूरकरांना वाहतूक कोंडी आणि अपघातांपासून किती दिलासा मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

