चंद्रपूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना दहा हजार रुपयांची तातडीने मदत देणार:- विजय वडेट्टीवार मंत्री मदत व पुनर्वसन

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    Sep 02, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- गेल्या काही दिवसापासून विदर्भात मुसळधार पाऊस सुरू होते. अशातच मध्यप्रदेशातील  संजय सरोवर प्रकल्पातील पाणी सोडल्याने  गोसिखुर्द प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडावे लागले. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, सावली तालुक्यातील अनेक गावासह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पूर आल्याने हजारो हेक्टर धानाच्या शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. घराघरात पाणी शिरल्याने अन्न धान्य, घरात असलेले साहित्य यांचे नुकसान झाले. या पूरग्रस्तांना अन्न धान्य व कपडे साठी प्रत्येकी पाच हजार या प्रमाणे दहा हजार रुपयांची तातडीने मदतीचे वाटप आज पासून सुरू करण्यात येत आहे अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करताना दिली. 
    मध्यप्रदेशातील संजय सरोवर प्रकल्पाचे पाणी सोडल्याने गोसिखुर्द प्रकल्पाचे पूर्ण दरवाजे 5 मिटर पर्यंत उघडावे लागले. त्यामुळे 1995 पेक्षाही भीषण महापूर पूर्व विदर्भातील भंडारा, नागपूर, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात आल्यामुळे अनेक गावे जलमय झाली. हजारो हेक्टर धानाची शेती पाण्याखाली आल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले. या महापुरात शेतकऱ्याचे पाळीव जनावरे वाहून गेली तर काही मृत्यमुखी पडले. तर अनेक घराघरात पाणी गेल्याने घरातील अन्न धान्य, कपडे, साहित्य यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यावेळी स्वतः राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार हे ब्रम्हपुरी तालुक्यात तळ ठोकून स्वतः पूरग्रस्त भागाची पाहणी बोट व हेलिकॉप्टर द्वारे करून या भिषण परिस्थितीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली. तसेच वडेट्टीवार यांनी पुरामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी व अन्न धान्य पोचविण्यासाठी एनडीआरएफ व एसडीआरफच्या टीम पाचारण केले. त्यामुळे आपगग्रस्त लोकांना     दिलासा देण्याचे काम वडेट्टीवार करीत असून या गंभीर परिस्थिती वर स्वतः जातीने लक्ष ठेऊन आहे. या आपद्ग्रस्तना तातडीने मदत मिळण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या वतीने अन्न धान्य यासाठी पाच हजार रुपये व कापड्यांकरिता पाच हजार रुपये या प्रमाणे प्रारंभिक मदतीचे वाटप आज पासून करण्यात येत आहे अशी माहिती राज्याचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देऊन त्यांनी पुढे सांगितले की, ही प्रारंभिक मदत असून अधिकाऱ्याकडून प्रत्यक्ष मोका पंचनामे केल्यानंतर भरीव मदत महाविकास आघाडी सरकार कडून करण्यात येणार आहे . यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.