सर्प, श्वान व प्राणी दंशामुळे मृत्यूच्या घटना घडण्यापासून दक्षता घेण्याचे आवाहन. #Chandrapur

Bhairav Diwase

चंद्रपूर:- जिल्ह्यात सर्प, श्वान व प्राणी दंश यामुळे बऱ्याचवेळा प्रथमोपचार व उपचार न मिळाल्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे अशा घटना घडण्यापासून दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.

जागतिक आरोग्य संघटनेच्या 2019 मध्ये ठरविलेल्या धोरणानुसार सर्पदंश, श्वानदंश व प्राणी दंशामुळे होणारे मृत्यूदर 50 टक्क्यांपर्यंत कमी करण्याकरिता प्राथमिक उपचार व व्यवस्थापन याबाबत कार्यशाळा जिल्हा परिषदेतील कन्नमवार सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते.

या कार्यशाळेप्रसंगी, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकर, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक जितेंद्र रामगावकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, स्नेकबाईट हेल्थ अँड एज्युकेशन सोसायटीचे फाउंडर श्रीमती प्रियंका, डॉ. फ्रेस्टन सिरूर, डॉ.डी.सी.पटेल, डॉ. नम्रता व मेडिकल कॉलेज, चंद्रपूर येथील डॉ. भागवत प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय येथील वैद्यकीय अधिकारी, ओपीडी अधिपरिचारिका, आरोग्य सेविका, उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी यांना सर्पदंश, श्वानदशं, प्राणीदंश यामुळे होणारे मृत्यू कमी करण्याकरिता प्राथमिक उपचार व व्यवस्थापन याबाबत प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण कार्यशाळेकरीता एकूण 178 अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यशाळेचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत तर आभार डॉ.सुधीर मेश्राम यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वितेकरिता वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रीती राजगोपाल व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.