घराची परझड व पिकाच्या नुकसानीचे पंचनामे करुन सरसकट मदत द्या #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase

शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख आशिष कावटवार यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली मागणी
पोंभूर्णा:- तालुक्यात गेल्या चार दिवसापासून पावसाने थैमान घातले असून धान,कपाशी, सोयाबीन पिकासह खरीप पिकांचे आणि अनेक गावातील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करुन तालुक्यातील प्रत्येक शेतकर्‍यांना सरसकट शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आशिष कावटवार यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

गेल्या चार दिवसापासून पोंभूर्णा तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे.अतिवृष्टीमुळे पोंभूर्णा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतातील कापूस,धान,सोयाबिन व आदी पिकांसह फळबाग व भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने कापूस, धान, सोयाबिन पीक लागवड पाण्यात बुडाले आहे.तसेच धान पिकाचे पऱ्हे वाहून गेल्याने प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान शेतात पाणी साचल्यामुळे खरीपाची इतर पिकेही पाण्याखाली गेली आहेत. तसेच सततधार पावसामुळे पोंभूर्णा तालुक्यातील बऱ्याच घरांची पडझडही झाली आहे.त्या घरातील संसारोपयोगी वस्तूंचेही मोठे नुकसान झाले आहे. परिणामी असंख्य कुटूंब उघड्यावर पडली आहेत. म्हणून अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या खरीप पिकांचा व पडझड झालेल्या घरांचा युध्दपातळीवर महसूल व कृषी विभागाला पंचनामा करण्याच्या सूचना द्याव्यात आणि सरसकट १०० टक्के नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तालुका प्रमुख आशिष कावटवार यांनी तहसीलदार यांना निवेदनातून केली आहे.