चंद्रपूर:- वर्ग 1 ली ते 8 वी मध्ये शिकणारे कोणतेही बालक पुस्तकापासून वंचित राहू नये, पाठ्यपुस्तकाअभावी शिक्षणात अडचण येऊ नये, तसेच शाळेतील सर्व दाखलपात्र मुलांची 100 टक्के उपस्थिती टिकविणे व गळतीचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खाजगी अनुदानित शाळा व अंशत: अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके पुरविण्यात आली आहे.
सन 2025-26 या शैक्षणिक सत्रासाठी जिल्ह्यातील 1 लक्ष 53 हजार 963 विद्यार्थ्यांकरीता 9 लक्ष 5 हजार 228 पाठ्यपुस्तकांची मागणी बालभारतीकडे करण्यात आली होती. त्यानुसार सर्व पाठ्यपुस्तके तालुका स्तरावर आणि तेथून शाळा स्तरावर पोहचविण्यात आली आहे. सदर पुस्तके शाळेच्या पहिल्या दिवशी 23 जून 2025 रोजी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य / गावातील पदाधिकारी / अधिकारी / प्रतिष्ठित नागरीक यांच्या उपस्थितीत समारंभपुर्वक विद्यार्थ्यांना मोफत वितरीत करून पुस्तक दिन साजरा करण्यात येणार असल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्विनी केळकर यांनी कळविले आहे.