सहकारी संस्था व बँकांप्रमाणेच ग्राम पंचायतींना सुध्दा मुदतवाढ देण्याची मागणी.
Bhairav Diwase. May 09, 2020
चंद्रपूर:- राज्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुदत संपलेल्या ग्राम पंचायतींच्या निवडणूकीचा पुढील कार्यक्रम जाहीर होईपर्यंत निर्वाचित सरपंच व ग्राम पंचायत सदस्यांना मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
या मागणी संदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव आणि ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव यांना त्यांनी ईमेलद्वारे पत्रे पाठविली आहेत. ग्राम पंचायत ही लोकशाहीच्या श्रृंखलेतील महत्वपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्था आहे. कोविड-19 अर्थात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने काही निवडणूकीच्या प्रक्रिया पुढे ढकलल्या आहेत. सहकारी संस्था व बँका यामध्ये प्रशासक न नेमता कार्यकारीणीला मुदवाढ देण्यात आली आहे. राज्यात अनेक ग्राम पंचायतींची मुदत संपलेली आहे. अशा परिस्थीतीत जो न्याय सहकारी संस्थांना आपण लागू केला आहे तोच न्याय ग्राम पंचायतींना सुध्दा लागू करण्याची आवश्यकता आहे. सदर ग्राम पंचायतींवर प्रशासक न नेमता जनतेद्वारे निर्वाचित ग्राम पंचायत सरपंच व सदस्य यांना पुढील निवडणूकीचा कार्यक्रम लागेपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी आ. मुनगंटीवार यांनी राज्य शासनाला केली आहे.