Bhairav Diwase. Sep 16, 2020
सावली:- सावली तालुक्यात ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली असून तालुक्यात मोठ्या प्रमाणात असलेला शेतकरी वर्ग खरीप हंगामी शेतीच्या कामाला लागला असून त्यामुळे शेतीची कामे पार पडली आहे. पण धान गर्भात येण्याच्या तर काही धान पिक एक महिन्यात कापनीस येणार आहे. परंतु शेतीसाठी तसेच पिकांच्या वाढीसाठी पूरक असलेला युरिया खताचा तुटवडा असल्याने बळीराजाला कृषी केंद्रासमोर ताटकळत उभे राहून नकारात्मक सुराने निराश आणि हताश होऊन परतावे लागत आहे. शेतीच्या कामाला जोमाने सुरुवात होऊनही अशा अनुकूल वातावरणात पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या युरिया खताची ऐन हंगामात तुटवडा झाल्याने संबंधित विषय शेतकऱ्यांची चिंता वाढवून डोखेदुखीचा विषय बनला आहे.
मागील काही दिवसांपासून युरिया खताचा तुटवडा निर्माण झाला असून धान उत्पादक शेतकरी युरिया खत न मिळाल्याने हवालदिल झाला आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना या वेळात, धान पिकांच्या पोषणासाठी व अधिक उत्पादनासाठी युरिया खताची आवश्यकता असते आणि ज्या पिरेड मध्ये युरिया खताची आवश्यकता असते, त्याच वेळेत युरिया खताचा तुटवता होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नैराश्य पसरले आहे.
येत्या एक महिन्यामध्ये धान (तांदूळ) शेतीचा शेवट होणार असून, आता येणारे पंधरा दिवस शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत या पंधरा दिवसाच्या कालावधी मध्ये शेतकरी आपल्या धानावर युरिया खताची मात्रा देतात परंतु जेव्हा शेतकऱ्यांना युरिया खताची आवश्यकता निर्माण होते तेव्हा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांची युरिया खतासाठी अडवणूक केल्या जाते, व खताचा तुटवडा निर्माण केला जातो. शेतकरी मागील काही दिवसापासून कृषी केंद्राकडे चकरा मारत असून कृषी केंद्रामध्ये युरिया खत नाही अशी उत्तरे कृषी केंद्र चालक यांच्याकडून मिळतात.
परत काही कृषी केंद्र चालक निव्वळ युरिया खत मिळणार नाही, त्याबरोबर तुम्हाला दुसऱ्या खताची बॅग न्यावी लागणार असे उत्तर देतात अशा प्रकारे शेतकऱ्यांना वेठीस धरल्या जात आहे. संबंधित कृषी विभागाने लक्ष देऊन यूरीया खत उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केल्या जात आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांचे गांभीर्याने दखल घेत तालुक्यात खताचा तुटवडा भरून काढून युरिया खताचा मुबलक साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मा. राकेश गोलेपल्लीवार प्रहार सेवक, सावली यांनी केली आहे.