Top News

आमटे कुटुंबात नेमका वाद कोणता; डॉ . शीतल आमटे- कराजगींनी का उचललं टोकाचं पाऊल?.

Bhairav Diwase. Nov 30, 2020
चंद्रपूर:- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे-कराजगी यांनी आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली. आनंदवन येथील राहत्या घरी विष घेत त्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर आमटे कुटुंबातील तो वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

     ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्याप्रमाणेच त्यांची दोन्ही मुलं डॉ. प्रकाश आमटे आणि विकास आमटेंनी सामाजिक कार्यं पुढे सुरूच ठेवले. महारोगी सेवा समितीच्या माध्यमातून त्यांनी गरिबांची सेवा करणं सुरूच ठेवलं होतं. आमटेंची तिसरी पिढी असलेल्या प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांची मुलं डॉ. दिगंत-अनिकेत आणि विकास आमटे यांची मुलं डॉ. शीतल-कौस्तुभ यांनी या कार्यात हातभार लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ही मुलं महारोगी सेवा समितीचा कार्यभार सांभाळत होती.

हेही वाचा:- आनंदवन येथे डॉ.शीतल आमटे यांची आत्महत्या.


            2016 मध्ये महारोगी सेवा समितीची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यात डॉ. शीतल आमटे-कराजगी आणि त्यांचे पती गौतम कराजगी यांना पद देण्यात आले. याच दरम्यान कौस्तुभ आमटे यांनी महारोगी सेवा समितीच्या सहसचिवपदाचा राजीनामा दिला. डॉ. शीतल आमटे-कराजगी आनंदवनात मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यभार सांभाळत होत्या. त्यांचे पती गौतम-कराजगी यांना अंतर्गत व्यवस्थापक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. मल्टिनॅशनल कंपनीत कामाचा अनुभव असलेल्या गौतम यांनी आनंदवनाच्या कामकाजात एखाद्या व्यावसायिक कंपनीसारखे व्यवहार आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतरच आमटे कुटुंबात वादाची ठिणगी पडली.

              महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-कराजगी यांनी सोमवारी 20 नोव्हेंबर 2020 रोजी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आमटे कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले होते. महारोगी सेवा समितीच्या कामावर आणि खासकरून विश्वस्तांवर आरोप ठेवले गेले होते. डॉ. शीतल आमटे-कराजगी यांनी सख्खा भाऊ कौस्तुभ आमटे, काका डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर बेछुट आरोप केले. त्याच्या अर्ध्या तासातच डॉ. शीतल आमटे-कराजगी यांनी तो फेसबुकवरील लाईव्ह व्हिडीओ काढून टाकला. विशेष म्हणजे डॉ. शीतल यांच्या फेसबुक लाइव्हनंतर समाजात गैरसमज पसरू नये म्हणून आमटे कुटुंबीयांनी संयुक्त निवेदन जाहीर करत डॉ. शीतल आमटे यांचे आरोप फेटाळून लावले.

आमटे कुटुंबात नेमका वाद कोणता?
            2016 साली नवी कार्यकारिणी कोणालाही न जुमानता आपल्या मनमानी पद्धतीने काम करत असल्याचं सांगत आनंदवनातीलच दोन व्यक्तींनी नाराजी उघड केली. त्यानंतर डॉ. विकास आमटे यांच्या जवळचे समजले जाणाऱ्या राजू सौसागडे यांनी नव्या कार्यकारिणीवर आक्षेप घेणं सुरू ठेवलं. आनंदवनातील ग्रामपंचायतीचे सदस्य असलेल्या राजू सौसागडे यांनी वादातून थेट पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. नव्या व्यवस्थापनानं कार्यालयात बोलावून अपमान केला. सर्व जबाबदाऱ्या काढून घेतल्याचं सांगत सौसागडे यांनी अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा नोंदवला. आनंदवनातील वाद आणि एकमेकांवर होत असलेले आरोप-प्रत्यारोप याच घटनेपासून चव्हाट्यावर येण्यास सुरुवात झाली. डॉ. प्रकाश आमटे यांनी त्यांचं कुटुंब 1973 मध्ये लोकबिरादरी प्रकल्पाचं काम सुरू करत गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसा येथे स्थलांतरीत झाले. तेथे त्यांनी आदिवासींमधील गोंड, माडिया समाजातील लोकांच्या आरोग्याचे प्रश्न, शिक्षण आणि उपजीविका यासाठी अनेक उपक्रम सुरु केले.

बातमी संकलन:- TV9 मराठी

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने