Top News

प्रिय सुधीरभाऊ.......Dear Sudhirbhau .......

   
सध्या आपण सगळेच एका महाकाय संकटातून जात आहोत. या संकटाशी दोन हात करताना सर्वच लोक जीवाची बाजी लावत आहेत. त्यात डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी आणि असंख्य कार्यकर्ते.. सर्वच हा लढा प्राणपणाने लढत आहेत.  पण प्रत्यक्ष नेतृत्वाने लोकांच्या मदतीसाठी रस्त्यावर येत या लढ्यात भाग घेतल्याचं उदाहरण क्वचित दिसतं. आपल्या शहरात असलेली कोरोनाची बिकट परिस्थिती आणि त्यात तुम्ही असे मेरूपर्वतासारखे या संकटासमोर शड्डू ठोकून उभे असल्याचं गेल्या वर्षभरापासून आम्ही पाहतोय. याबद्दल अनेकदा तुम्हाला मनापासून धन्यवाद द्यावे वाटले, आभार मानावे वाटले.. अखेर आज न राहवून तुम्हाला पत्रच लिहीत आहे.
सुधीरभाऊ, संपूर्ण राज्यातच कोरोनाची भीषण परिस्थिती आहे. कुठलाही जिल्हा, तालुका या संकटातून सुटलेला नाही. सर्वांची तीच गत. उपचाराअभावी, अपुऱ्या सुविधांच्या अभावी माणसं मरताना पाहिली की मन हेलावून जातं. काहीतरी अघटित घडत असल्याची भावना असुरक्षित करते. यावेळी एखाद्या अधिकारी व्यक्तीने पहाडासारखं मागे उभं राहिलं तर संकट थोडं हलकं होतं. आपला आधार आमच्यासाठी असाच पहाडाचं काम करतोय.
राज्यातल्या सरकारने गेल्या वर्षभरात अनेक उपाययोजना, सुविधा यांच्यावर काम केलं. पण पुणे मुंबई वगळता इतर जिल्ह्यांकडे, छोट्या शहरांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. अर्थात सत्तेत असलेल्या प्रमुख पक्षही तसा मुंबईकरच असल्याने त्यांना राज्याची काही पडलेली नाही यात नवल नाहीच म्हणा! त्यात चंद्रपूरसारखा भाग म्हणजे विचारायला नको. सावत्र मुलासारखी  वागणूक आपल्या पाचवीलाच पुजलेली. या अशा दुहेरी संकटात तुमच्यासारखा माणूस थेट रस्त्यावर उतरून, रुग्णांची विचारपूस करत, कुणाला काय हवं नको ते बघत,  आमच्या प्रत्येक गरजेला धावून जात आहे. ही गोष्ट आमच्या सगळ्यांसाठी प्रचंड धीराची आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून तुम्ही जे करत आहात ते पाहून या संकटात काम करणाऱ्या प्रत्येकालाच प्रेरणा मिळतेय. 
सुधीरभाऊ, राज्यात भाजपचं सरकार गेल्यानंतर आमच्या माथ्यावर असलेलं अनुशेषाचं जोखड उतरण्याची शक्यता धूसर झालेली असताना आता हे नवीन संकट समोर येऊन उभं आहे. गेल्या सरकारच्या काळात ५ वर्ष तुम्ही आमचे पालकमंत्री होतात. त्या पदाला 'पालक'मंत्री का म्हणतात हे तुमच्या केलेल्या कामातून दिसून आलं. 
इंजेक्शनचा आणि बेडचा तुटवडा तर सगळीकडेच आहे. अशा काळातही आपण चंद्रपूरकरांना योग्य त्या आरोग्य सुविधा मिळवून देण्यास नक्कीच कसोशीने प्रयत्न कराल यात शंकाच नाही पण भाऊ, आपणही आपल्या तब्येतीची काळजी घ्या. आपणास उत्तम आरोग्य लाभावे हीच माता महाकाली चरणी मी प्रार्थना करतो!
राज्यात आपल्या पक्षाचं सरकार नसताना, पद नसतानाही तुम्ही ज्या धैर्याने या संकटाच्या पुढ्यात उभे आहात ते पाहून तुमचा फक्त आणि फक्त अभिमान वाटतो. या सगळ्यासाठी तुम्हाला एकदा धन्यवाद म्हणायचं होतं, म्हणून हा पत्रप्रपंच.

✒ऋजुता चित्तरंजन कावडकर ,चंद्रपूर

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने