राजुरकरांच्या पक्ष प्रवेशामुळे पक्ष बळकट होईल:- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #chandrapur #bhadrawati

Bhairav Diwase
0

विविध पक्षातील अनेकांचा भाजपात प्रवेश

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- रमेश राजुरकर हे जनमानसातील समजदार नेते असून त्यांच्या पक्षप्रवेशाने पक्ष बळकट होईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील जैन मंदिर सभागृहात भाजपातर्फे आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून केले.


यावेळी मंचावर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आ. बंटी भांगडिया, आ. संजीव रेड्डी बोदकुवार, भाजपाचे ज्येष्ठ नेते बळवंतराव गुंडावार, विजय राऊत, अफझलभाई, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, तालुका अध्यक्ष तुळशीराम श्रीरामे, महामंत्री नरेंद्र जीवतोडे, शहर अध्यक्ष प्रवीण सातपुते, शहर महामंत्री किशोर गोवारदिपे, प्रशांत डाखरे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

फडणवीस पुढे म्हणाले की, मोदींनी नऊ वर्षांत देशाला उंच शिखरावर नेले. या देशातील गरीब जनतेला अन्न, पाणी, घर अशा मुलभूत वस्तू मिळाल्या पाहिजेत असे मोदीजींचे धोरण आहे.८० क़ोटी लोकांना मोफत अन्नधान्य दिले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि खासदार यांनी मोदींची प्रशंसा केली असून ते वैश्विक नेते झाले आहेत. असेही फडणवीस म्हणाले.

कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, श्यामाप्रसाद मुखर्जी आणि अन्य थोर पुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचे एका भल्या मोठ्या पुष्पहाराने स्वागत करण्यात आले.तसेच यावेळी सर्व मान्यवरांचे राजुरकर यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

  यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि रमेश राजुरकर यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन प्रा.डाॅ.प्रशांत खुळे यांनी केले. कार्यक्रमाला वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)