Top News

'त्यांनी' संविधानाला साक्षी मानून बांधली लगीनगाठ #chandrapur #Bhandara


नवरीची लग्न मंडपात खास 'एन्ट्री'

भंडारा:- लग्न हे दोन मनांचं, दोन कुटुंबाचं मिलन असतं, तसंच ते दोन स्वभावांचंही मिलन असतं. दोन जिवांची सात जन्माची गाठ या लग्नरुपी नाजूक धाग्याने बांधली जाते. अनेकजण हा खास दिवस आणखी खास करण्यासाठी विविध गोष्टी करतात. अलीकडे विवाह मंडपात पाहुण्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी अनोखी शक्कल लढविल्या जाते, ज्यासाठी बक्कळ पैसाही उडविला जातो. परंतु, लाखनी तालुक्यात एक असा विवाह सोहळा पार पडला ज्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे. या आगळ्यावेगळ्या आदर्श विवाह सोहळ्याचं सर्वत्र कौतुक केलं जातयं.

भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्याच्या पोहरा गावातील तरुणी प्रांजल धनराज बडोले हिचा विवाह अमरावती जिल्ह्यातील पंकज धनराज पाटील यांच्याशी जुळला. दोघेही पत्रकार आहेत. विचाराने प्रगल्भ असलेल्या 'या' नव विवाहीत दाम्पत्यानं भारतीय संविधानाला साक्ष मानून आदर्ष विवाह पार पाडण्याचा विचार केला अन् तो अंमलातही आणला. नवरीनं विवाह समारंभात चक्क भारतीय संविधानाचा ग्रंथ हातात घेऊन वाजत गाजत खास एन्ट्री केली अन् उपस्थित पाहुण्या मंडळीचं मनं जिंकून घेतलं.

तथागत गौतम बुध्द आणि भारतत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून विवाह सोहळ्याला सुरूवात झाली. त्यानंतर भारतीय संविधानाला साक्ष मानून स्वांतत्र्य, समता, आणि बंधूता या सांवैधानिक तत्वप्रणालीचा अंगीकार करत सध्द्म्मात जीवन जगण्याचा संकल्प या दोघांनी केलाय.

या विवाह सोहळ्याला बौद्ध भिक्कू नाथ पुन्नो, बौध्द धम्माचे प्रचारक प्रा. सुभाष शेंडे, उपासिका नीता डोंगरे यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. तर लग्न समारंभाचं सुंदर सुत्रसंचालन नीशा रामटेके (शेंडे) आणि प्रभाकर सोनडवले यांनी केलं. या आदर्श विवाह सोहळ्यांचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने