10 वी तील वर्गमित्रांचे भद्रावती येथे स्नेहमीलन 31 मार्चला
भद्रावती:- मनात आलेल्या संकल्पनेला अस्तित्वात आणण्यासाठी मोठे कौशल्य लागत असते. प्रत्येकाचे आचार विचार ,वैचारिक पातळी, अपेक्षा या भिन्न भिन्न असू शकतात मात्र त्यांना एका प्रवाहात आणून आठवणींच्या मंचावर सजविताना नियोजनकर्त्याना आपला वैयक्तिक वेळ आणि शारीरिक योगदान देत असताना प्रसंगी स्वतःची पदरमोड देखील खर्ची घालावी लागत असते. यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.नेमक्या याच मोठेपणातून भद्रावती येथील आशिष ठेंगणे आणि विना जूनघरे यांनी आपल्या संकल्पनेतून आपल्या राज्यभरात विखुरलेल्या जिवाभावाच्या मित्रांना एकत्र आणण्याचे धाडस स्वीकारले.या मोहिमेत सहभागी करून घेण्यासाठी भद्रावती येथील स्थायी मित्र राजू बदखल, गणेश बोबडे,विनोद लोहकरे,सुभाष बांदूरकर,लीना उराडे, प्रमोद वाळवे,सुनंदा कांबळे,लीना उराडे आदींसी संपर्क करत वर्ष 1990-91 मधील जिल्हा परिषद हायस्कुल भद्रावती येथील आपल्या इयत्ता10 वी मधील वर्गमित्रांचे शोधकार्य सुरू केले.सर्वांनी आपआपल्या माध्यमातून अगदी जिद्दीने मेहनत घेत सोशल मीडिया सारख्या माध्यमातून मित्रांना एकत्रित करण्याची मोहीम हाती घेतली.अखेर त्यांच्या मोहिमेला यश मिळाले असून आजघडीला जवळपास 60 ते 70 वर्गमित्रांचे भद्रावती येथील शिंदे मंगल कार्यालयात 31 मार्च रोजी स्नेहमीलन होणार आहे.एक दिवसाच्या मैत्रीच्या या शाळेत जुन्या आठवणीतील विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद घेणार असून याचेच औचित्य साधत आपल्या माजी शिक्षकांना देखील निमंत्रण देत त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.प्रसंगी या स्नेहमीलन सोहळ्यासाठी या मित्रांमध्ये अतिउत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
तब्बल 33 वर्षानंतर होत असलेल्या या भेटीने सर्वांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा