Top News

महाविकास आघाडी राज्यात 38 पेक्षा जास्त जागा जिंकणार?Vijay Wadettiwar


काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्याचा दावा
मुंबई:- महाराष्ट्रात महाविकास आघाडी 38 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा विश्वास राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी व्यक्त केला. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची जागा धोक्यात असल्याचेही वडेट्टीवार म्हणाले.

महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे (Dr. Shivaji Kalge) यांच्या प्रचारार्थ विजय वडेट्टीवार यांच्यासह रमेश चेन्नीथला, अमित देशमुख यांच्या उपस्थितीत अहमदपूर येथे जाहीर सभा घेण्यात आली. यावेळी विजय वडेट्टीवार बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपवर चौफेर टीका केली.

देशात भाजपच्या 200 च्या आत जागा येतील

देशात तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू होणार आहे. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये देशाचा नूर लक्षात आला आहे.. भाजपाच्या बाबतीत लोकांमध्ये प्रचंड संताप आहे. यामुळं महाविकास आघाडी राज्यामध्ये 38 पेक्षा जास्त जागा जिंकेल. नितीन गडकरी यांची जागा सुद्धा धोक्यात आली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात जागा कमी येतील असा सांगणारा भाजप शेवटच्या टप्प्यापर्यंत दोनशेच्या आत येईल आणि देशाचे चित्र बदलेल असे वडेट्टीवार म्हणाले. विदर्भातील दहाही जागा या भाजपाच्या हातातून जातील असंही वडेट्टीवार म्हणाले. 

प्रकाश आंबेडकरांशी चर्चा झाली पण...

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीशी आमची चर्चा झाली होती. पण शेवटच्या टप्प्यात विषय मार्गी लागला नाही असंही वडेट्टीवार म्हणाले. जागा वाटपातून निर्णय झाला नाही. ते आज अनेक कारणं सांगत आहेत, त्यात फार काही तथ्य नाही असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. 

येत्या 7 मे ला देशातील तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान 

भाजपचे नेते नितीन गडकरी हे नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. पहिल्या टप्प्यातच या मतदारसंघासाठी मतदान झाले आहे. मात्र, या मतदारसंघातून नितीन गडकरी निवडून येणार नाहीत असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. मात्र, नितीन गडकरी हे नागपूर लोकसभा मतदारसंघातून विक्रमी मतांनी निवडून येतील असा दावा भाजपच्या नेत्यांनी केला आहे. दरम्यान, दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी जरी दावा केला असला तरी येत्या 4 जूनपर्यंत कोण निवडून येणार याचा निकाल लागलेला नाही. 4 जून नंतरच सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान येत्या 7 मे ला देशातील तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रातील महत्वपूर्ण लढती होणार आहेत. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने