सिंदेवाही:- एका धक्कादायक घटनेत, चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात एका महिलेने पतीच्या जाचाला कंटाळून त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना १४ जून रोजी रात्री सिंदेवाही तालुक्यातील नवीन जामसाळा येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, वैशाली चौधरी नावाच्या महिलेने तिचा पती दुर्वास चौधरी यांचा रुमालाच्या सहाय्याने गळा आवळून खून केला. मृतकाची आई, सुनंदा चौधरी यांनी सिंदेवाही पोलीस ठाण्यात आपली सून वैशाली चौधरीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी वैशाली चौधरीला ताब्यात घेतले असून तिच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
नवीन जामसाळा येथे सदर घटना १५ जून ला रविवार सकाळी सहा वाजता उघडकीस आली. कौटुंबिक वादातून हि हत्या झाली अशी माहिती सिंदेवाही पोलिसांनी दिली आहे.
सध्या देशभरात प्रेमाच्या लोभापायी लग्न झाल्यावर पतीचा खून केल्याच्या घटना चर्चेत असताना आणि राज्यात कौटुंबिक हिंसाचारातून महिलांच्या आत्महत्यांची प्रकरणे उघडकीस येत असताना, ग्रामीण भागातून आलेली ही घटना कौटुंबिक कलहातून टोकाची पावले उचलली जात असल्याचे अधोरेखित करते. सिंदेवाही पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.