चंद्रपूर:- नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सावर्ला शेतशिवारात करत असताना वीज पडून एका मजुराचा जागीच मृत्यू झाला तर एक मजूर गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी (दि.१६) दुपारी चारच्या सुमारास घडली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सध्या धान रोवणीचा हंगाम सुरू असल्याने ओवाळा गावातील मनोज ज्ञानेश्वर मांदाडे (वय २४) आणि अक्षय नारायण मांढरे (वय २५) हे दोघे मजूर सावर्ला परिसरातील नांगरे यांच्या शेतात काम करत होते. यावेळी अचानक हवामानात बदल होऊन वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. या दरम्यान शेतातच वीज कोसळून मनोज मांदाडे याचा जागीच मृत्यू झाला तर अक्षय मांढरे हे गंभीर जखमी झाले. जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती पोलीस पाटील अपुर्वा मेश्राम यांनी तळोधी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला.