Maharashtra News: 'जनगणनतेच्या बनावट अर्जांमध्ये माहिती भरु नका', महाराष्ट्र सरकारने माहिती देऊन केलं महत्त्वाचं आवाहन

Bhairav Diwase

मुंबई:- देशाच्या विकासाचा आराखडा ठरवणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रियेला अर्थातच जनगणना २०२७ला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. यंदा प्रथमच नागरिकांना 'स्व-गणना' या डिजिटल सुविधेद्वारे स्वतःची माहिती स्वतः नोंदवण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभिनव उपक्रमामुळे जनगणना अधिक अचूक, पारदर्शक आणि तंत्रज्ञानाधारित होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. दरम्यान सोशल मीडियावर सध्या एक अर्ज व्हायरल झाला आहे. अशा प्रकारच्या अर्जांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन महाराष्ट्र सरकाने पोस्ट लिहित केलं आहे. हा अर्ज बनावट आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.


DGIPR ची पोस्ट नेमकी काय?

जनगणना २०२७ च्या अनुषंगाने सध्या सोशल मीडियावर एक अर्ज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तो बनावट आणि अनधिकृत आहे. जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यांतर्गत, नागरिकांनी खालील दोन अधिकृत माध्यमांतूनच ३३ अधिसूचित प्रश्नांची माहिती देणे आवश्यक आहे.

१. स्व नोंदणी - नागरिक https://se.census.gov.in या संकेतस्थळावर माहिती भरू शकतात. फॉर्म सबमिट केल्यानंतर मिळालेला 'SE ID' त्यानंतर येणाऱ्या प्रगणक भेटीदरम्यान पडताळला जाईल.

२. थेट माहिती देणे - दि. १६.०५.२६ ते १४.०६.२६ या कालावधीत आपल्या घरी येणाऱ्या अधिकृत प्रगणकांकडे प्रत्यक्ष माहिती देऊन नोंदणी करता येईल.

३) सोशल मीडिया किंवा इतर प्लॅटफॉर्मवर फिरणाऱ्या कोणत्याही अनधिकृत अर्जांद्वारे, लिंकद्वारे किंवा अनोळखी व्यक्तींना आपली वैयक्तिक माहिती देऊ नका.


स्व-गणना कालावधी १ ते १५ मे २०२६ इतका आहे
स्व-गणना कालावधी हा १ मे ते १५ मे २०२६ इतका आहे. या कालावधी मध्ये नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने आपली आणि कुटुंबाची माहिती देता येणार आहे. तर घरयादी व घरगणना टप्पा हा १६ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. या कालावधीत नागरिकांनी स्वतःहून माहिती भरल्यास, पुढील प्रत्यक्ष भेटीत प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद होईल. दरम्यान याच पार्श्वभूमीवर काही अर्ज सोशल मीडियावर पोस्ट केले जात आहेत. या प्रकारचे अर्ज हे बनावट असून त्यावर विश्वास ठेवू नका असं आवाहन महाराष्ट्र सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने कळवलं आहे.


२०२७ ची जनगणना ही डिजिटल

२०११ नंतर देशभरात जनगणना झालेली नाही. यावेळी होणाऱ्या जनगणनेचं वैशिष्ट्य म्हणजे भारताच्या इतिहासातील ही पहिली डिजिटल जनगणना असणार आहे. या जनगणनेत मोबाइल अॅप्सचा वापर, ऑलाइन सेल्फ एन्युमरेशन आणि रिअल टाइम मॉनिटरिंग यांचा समावेश करण्यात आला आहे. १९३१ नंतर पहिल्यांदाच या जनगणनेत जातनिहाय जनगणना करण्यात येणार आहे.